प्रतिनिधी – रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – खेड तालुक्यातील २५ पैकी १९ ग्रामपंचायती साठी मतदान सुरू असून दुपार नंतर तिन्हेवाडी व सातकरस्थळ ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया संत गतीने सुरू असल्याने मतदारांच्या केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत तर वेळेत मतदान करता येत नसल्याने मतदार आक्रमक झाले आहेत.
खेड तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून २५ पैकी ६ ग्रामपंचायती लोकनियुक्त सरपंचासकट बिनविरोध झाल्या आहेत तर उर्वरित १९ ग्रामपंचायती साठी आज सकाळीपासून मतदान सुरू आहे.
तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या तिन्हेवाडी व सातकरस्थळ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया संत गतीने असल्याने मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सुमारे दोन तीन तासापासून मतदार मतकेंद्रावर मतदानासाठी थांबून आहेत. मत केंदावर जादा मतदार संख्या आणि अधिकारी कमी यामुळे गर्दी वाढली आहे. तालुक्यातील तिन्हेवाडी ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी झाली आहे.
संत गतीने मतदान प्रक्रिया सुरू असल्याने मतदान केंद्राबाहेरची गर्दी कमी होत नाही. तासनतास वृद्ध, आजारी मतदार रांगेत उभे आहेत. स्थानिक निवडणूक प्रशासनाला कळवूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. असा आरोप मतदारांनी केले
वेळेत मतदान करता येत नसल्याने मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण झाले आहे. त्यात गर्दी वाढतच असल्याने मतदान केंद्र अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आहे.
चार वाजेपर्यंत सुमारे ५० ते ६० टक्के मतदान झाले आहे. अजूनही ४० टक्के मतदार मतदान केंद्राबाहेर उभे असून काही मतदार रांगेतून मतदान न करताच माघारी जात आहेत.
याबाबत नायब तहसीलदार राम बीजे यांनी सांगितले, मतदान केंद्रावर सरपंच पदासाठी आणि प्रभागातील तीन उमेदवारांना मतदान करण्यासाठी मतदाराला जास्त वेळ लागत आहे. त्यामुळे मतदान प्रकिया धीम्या गतीने होत आहे. गरज असलेल्या मतदान केंद्रावर जादा कर्मचारी पाठवले आहेत.