पुणे – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) पुनर्वसन करण्यात आलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील साठलेला कचऱ्याबरोबर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ते गोळा करण्याचे काम “स्वच्छ’ या संस्थेच्या माध्यमातून प्राधिकरणाने हाती घेतले आहे. प्रायोगिक तत्त्वावर “स्वच्छ’च्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरातील तीन गृहनिर्माण सोसायटीतील हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन हे प्राधिकरणामार्फत केले जाते. विकसक पुढे आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून हे पुनर्वसनाचे काम केले जाते. इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर सोसायटी स्थापन करून ती रहिवाशांच्या ताब्यात दिली जाते. त्यानंतर मात्र सोसायटीतील रहिवाशांकडून पुरेशी देखभाल केली जात नाही. परिणामी सोसायटीच्या मोकळ्या जागेत कचऱ्या टाकणे, जिन्यामध्ये अस्वच्छता, असे चित्र दिसते. त्यातून आरोग्याचे प्रश्नही निर्माण होतात. त्यामुळे केवळ पुनर्वसन करण्यापलीकडे तेथील रहिवाशांच्या जीवनमानात कोणताही फरक पडत नाही.
परिणामी या सोसायट्यांनाही झोपडपट्टीचे स्वरूप येते. हे ओळखून त्यांना आरोग्यासह सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देण्यासाठी प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. याविषयी अधिक माहिती देताना एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निबांळकर यांनी सांगितले की, झोपडपट्टीचे पुनर्वसन म्हणजे केवळ इमारत बांधून देणे, एवढा मर्यादित विचार न करता त्यांचे राहणीमानाच दर्जा वाढविणे गरजेचे आहे.