पुणे – कात्रज-बोपदेव घाट ते सासवड मार्गावर पीएमपी बसची संख्या कमी आहे. पण, या मार्गावर प्रवासी संख्या जास्त आहे. मात्र, पीमपी प्रशासन बस नियमित सोडत नाही. तसेच, बसची संख्या कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
कात्रज-सासवड मार्गावर जवळपास दीड वर्षांपासून पीएमपीची मिडी बस सुरू आहे. या बसेसची क्षमता कमी असून बसमध्ये गर्दी होत आहे. शिवाय या मार्गावरील कित्येक बसेसना वायपर नाहीत. आसन व्यवस्थेची दुरवस्था, काचा तुटलेल्या अवस्थेत आहेत. तर, बोपदेव घाटात अपघाती व तीव्र वळणे असल्यामुळे लोकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. अनेकदा या मार्गावर रात्रीच्या सुमारास बस बंद पडल्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे प्रशासनाने दुरुस्त केलेल्या बसेस पाठविण्याची गरज आहे.
कात्रज-सासवड बसची संख्या वाढविण्यात यावी आणि त्यामधील त्रुटी दूर करण्याबाबत पीएमपी प्रशासनाला वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पीएमपी प्रशासनाने या मार्गावरील प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
दत्तात्रेय फडतरे, प्रवासी