राज्यशासनाकडून पूरग्रस्तांसाठी 154 कोटींची मदत जाहीर
सातारा – पश्चिम महाराष्ट्रावर पावसाचे अस्मानी संकट कायम असून सांगली व कोल्हापुर जिल्ह्यामध्ये पुराचा धोका अद्यापही ओसरलेला नाही. बचाव पथकाने आत्तापर्यंत दोन लाख 52 हजार आठशे तेरा नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविल्याची माहिती सरकारी यंत्रणांच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, कर्नाटकातील अलमट्टी धरणातून साडे चार लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने कोल्हापुरातील पंचगंगेची पाण्याची कमी होण्यास सुरुवात झाली असून महसूल मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. पूरग्रस्त भागांना साताऱ्यातून मदतीचा ओघ वाढला असून अन्नधान्य, औषधे व इतर अत्यावश्यक सेवांचा पुरवठा करण्यात येत आहे.
कोल्हापूर, सांगलीसहित राज्यात अनेक ठिकाणी पुराचा फटका बसला असून जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाल; आहे. कोल्हापूर, सांगलीत पुराने थैमान घातले असून अनेक लोक अडकले आहेत. अनेक लोक छतावर आपला जीव मुठीत घेऊन मदतीची वाट पाहत आहेत. पावसात उभा केलेला सगळा संसार डोळ्यासमोर बुडताना पाहूनही जगण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे.
कोल्हापूर व सांगलीतील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष स्थानिक प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल शिवाय लष्कर, नौदल, वायूदल व ओडिसा पंजाब, गुजरात राज्यातील व्यवस्थापन दले अशा 2600 कर्मचाऱ्यांचे पथक तैनात आहे.
नौदलाची 26, तटरक्षक दलाची सांगलीमध्ये 2, कोल्हापुरात 9, सैन्यदलाची 8 पथके तयार आहेत. कोल्हापुरात 76 तर सांगलीमध्ये 90 बोटींद्वारे बचाव कार्य सुरु आहे. सांगली व कोल्हापुर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा सातत्याने घेतला जात असून पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्य शासनाने 154 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाला दिल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील पूराच्या पाहणी दरम्यान दिली. आपत्तीग्रस्त नागरिकांना प्रतिकुटुंब 10 हजार व शहरी भागातील कुटुंबांना 15 हजार अशा पद्धतीने ही मदत वाटण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोल्हापूरमधील 239 व सांगली जिल्ह्यातील 90 अशी 329 गावे पुराने बाधित झाली असून त्यांची 270 ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे.