रविवारपर्यंत खोळंबा : दरडप्रवण क्षेत्रांच्या दुरुस्तीचे कारण
पुणे – मुंबईतील अतिवृष्टी आणि घाटमार्गात कोसळलेल्या दरडींमुळे सलग सहाव्या दिवशी रेल्वे वाहतूक ठप्प राहणार आहे. रविवारपर्यंत पुणे ते मुंबई मार्गावरील कामांमुळे या मार्गावरील गाड्या धावणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
गेले आठ दिवस अर्थात दि.2 पासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही परिस्थिती आणखी दोन ते तीन दिवस कायम असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर, दि. 26 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीमध्ये घाट परिसरामध्ये कोसळलेल्या दुरुस्तीसाठी ब्लॉक घेण्यात आला होता. तर दि.2 ऑगस्टपासून संततधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. यामुळे पुणे ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेस आणि पुणे-मुंबई मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वेने रोज प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांची “लाइफलाइन’ असणाऱ्या रेल्वे एक ना अनेक कारणांमुळे रद्द केल्या आहेत. या ऐनवेळी बदलण्यात आलेल्या नियोजनामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. तिकीट आरक्षित केलेल्या आणि मासिक पास असणाऱ्या प्रवाशांना या वेळापत्रकाचा सर्वाधिक फटका बसत आहे.
डेक्कन क्वीन, सिंहगड,इंटरसिटी, प्रगती आजही रद्द
घाट परिसरात कोसळणारी दरड, दुरुस्तीचे काम आणि संततधार पाऊस यामुळे सलग सहाव्या दिवशी रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. यामध्ये डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. यासह मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ-पुणे एक्स्प्रेस, पुणे-पनवेल-पुणे पॅसेंजर, पुणे-इंदोर एक्स्प्रेस या गाड्यांसह मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस शनिवारी धावणार नाहीत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. तर दि.10 रोजी नांदेड-पनवेल विशेष गाडी पुणे स्थानकापर्यंत धावणार आहे. पनवेल-नांदेड विशेष गाडी पुणे स्थानकातून सुटणार आहे.
खासगी सेवांचा “भाव’ वाढला
एकावेळासाठी खासगी ट्रॅव्हल्स आणि कॅबचालकांकडून सुमारे 400 ते 1000 रुपयांपर्यंत भाडे आकारले जात आहे. तर एसटीचे तिकीट 200 रुपयांपेक्षा जास्त असल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. या “अव्वाच्या सव्वा’ तिकिटांमुळे दररोज प्रवाशांना किमान 800 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
इंटरसिटी एक्स्प्रेस बंद असल्याने रोज बसने प्रवास करावा लागतो. यामुळे रोजचा जादा 1 तास प्रवासात जात आहे. यासह 800 ते 900 रुपयांचा भुर्दंडदेखील सहन करावा लागत आहे. रेल्वे बंद असली, तरी सुट्टी घेऊन चालत नाही. आठवडाभरापासून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कमी पगार असणाऱ्या प्रवाशांनी रोजचे हजार रुपये प्रवासात घालवायचे का?
– नागेश म्हस्के, प्रवासी, इंटरसिटी एक्स्प्रेस.