सातारा – द्राक्षबागेसाठी विम्याची रक्कम भरून देखील परताव्याची रक्कम न मिळाल्याने माण तालुक्यातील शेतकऱ्याने दहिवडीतील सहाय्यक निंबधक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, परताव्याच्या मंजूर यादीपैकी एका यादीवर पात्र असल्याची तर दुसऱ्या यादीत व्हाईटरने खाडाखोड करण्यात आली आहे. खाडाखोड करणाऱ्या व्यक्तीची सखोल करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्ते शेतकरी रामचंद्र यादव यांनी केली आहे.
पळसावडे (ता. माण) येथील रामचंद्र एकनाथ यादव हे शेतकरी पळसावडे- देवापूर सोसायटीचे सभासद आहेत. पळसावडे येथे यादव यांची 50 गुंठे क्षेत्रात द्राक्षबाग आहे. त्यांनी 1 ऑगस्ट 2018 रोजी कर्ज व्याज व विमा मिळून दोन लाख अकरा हजार रूपये भरले होते. तसेच दि. 2 मे 2019 रोजी दोन लाख सात हजार चारशे चाळीस इतके व्याज व रक्कम भरली.
दरम्यान, द्राक्षबागेची झालेल्या नुकसानीची विम्याची रक्कम इतर शेतकऱ्यांना मिळाली. मात्र, यादव यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. याबाबत सोसायटीचे सचिव बाळासाहेब बाबर यांच्या संपर्क साधण्यात आला. त्यावर यादी जिल्हा बॅंकेच्या देवापूर शाखेत पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर बॅंकेत चौकशी करताना पात्र यादी पाहताना एका यादीत यादव यांचे नाव आहे तर दुसऱ्या यादीत यादव यांचे नाव व्हाईटनरने नाव खोडण्यात आले असून पुढे सोसायटी सचिवांनी स्वाक्षरी केली आहे. या प्रकारामुळे द्राक्षबाग विमा मिळू शकणार नाही, असे दिसून येत असल्यामुळे बेमुदत उपोषण करत असल्याचे यादव यांनी निवेदनात नमूद केले असून संबधित सचिवाची चौकशी करून उत्तर देण्यात यावे व चौकशीत जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यादव यांनी केली आहे.