नियमांचे काटकोरपणे पालन करा : वाहतूक विभागाचे आवाहन
पुणे – शहरामध्ये वाहन चालविताना वाहन चालकांनी नियम पाळणे गरजेचे आहे. नियमांचे पालन न केल्यास वाहतूक विभागाकडून दंड आकारण्यात येतो. मात्र, नियम मोडूनदेखील नागरिक वाहतूक पोलिसांशी वाद घालतात. याबाबत वाहतूक विभागाकडून नागरिकांना दंड पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर काही वाहनचालक स्वत:हून नियमांचे पालन असल्याचे म्हणत वाहतूक विभागाने नागरिकांची पाठ थोपटली आहे.
शहरातील मध्यवर्ती भागामध्ये वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, नागरिकांनी स्वयंशिस्तीने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सिग्नल पाळणे, हेल्मेट वापरणे, चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्ट लावणे आदी नियमांचे पालन नागरिकांकडून होत नसल्याने वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे.
पायाभूत सुविधा सुधारावी
वाहतूक पोलीसांची यंत्रणा कायद्याच्या चाकोरीमध्ये कारवाई करते. मात्र, नागरिक दंडाच्या रकमांबाबत वाहतूक पोलिसांशी विनाकारण वाद घालतात. शहरातील वाहतूक समस्येचे प्रमाण जितके समजले जाते, तितके नाही. त्याच्यावर जितकी चर्चा केली जाते, त्यापैकी कितीतरी पटीने समस्या कमी आहे. नागरिकांकडून समस्येबाबत विनाकारण चर्चा केली जाते. शहरातील सार्वजनिक वाहतूक आणि पायाभूत सुविधा सुधारल्यास वाहतुकीच्या परिस्थितीमध्ये नक्कीच सुधारणा होईल, असेही देशमुख यांनी नमूद केले.
नियम पाळणाऱ्यांची संख्या वाढावी
वाहतूक पोलीस चौकाचौकात दंड आकारत होते, त्यानंतर “ई-चलन’ आणि “सीसीटीव्ही’ द्वारे कारवाई केली ही वाहतूक विभाग कायद्याच्या चौकटीत राहून करत आहे, तरी देखील नागरिक हमखास वाहतूक पोलिसांशी वादावादी करतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे. वाहतूक विभागाचे कर्मचारी “स्पॉट’वर नसतील, तरी काही नागरिक सिग्नल पाळणे, झेब्रा क्रॉसिंगच्या मागे उभे राहणे आदी नियम पाळतात. नियमांचे पालन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होणे आवश्यक आहे, असे शहराचे वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख म्हणाले.