आळंदी (वार्ताहर) – आळंदी शहरात व शहरातील आजूबाजूच्या परिसरात रविवारी (दि. 28) साखरपुडा समारंभ व लग्न सोहळे मोठ्या प्रमाणात होते.त्याचा परिणाम आज आळंदी शहरातील वाहतुकीवर झाला. आळंदी शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.
वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे चाकण रस्ता, वडगांव रस्ता, देहूफाटा (वाय जंक्शन), प्रदक्षिणा रस्ता, पालिका चौक रस्ता, मरकळ रस्त्यावर वाहनांची मोठी रांग लागली होती. बर्याच वेळ एकाच जागी वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र होते. एकाच जागी वाहतूक काही वेळ ठप्प झाल्याने आळंदीकर नागरिकांसह इतर वाहनातून रहदारी करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते.
तर प्रदक्षिणा रस्त्यावर नो पार्किंगच्या फलका समोरच बेशिस्तपणे दुतर्फा चारचाकी वाहने पार्किंग केलेली दिसून येत होती. तसेच वडगाव रस्त्यावर काही ठिकाणी दुतर्फा वाहने बेशिस्तपणे पार्किंग केल्याची आढळून येत होती. यामुळे वाहतूक कोंडीत अजून भर पडली होती. बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिस कारवाई करत होते.
आळंदी शहरातील काही कार्यालयांमध्ये पार्किंग व्यवस्था अपुरी असल्याने त्या कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यांवरच लग्न सोहळ्यासाठी आलेले नागरिक वाहन लावतात.तसेच इतर कारणास्तव आलेले नागरिक सुद्धा बेशिस्तपणे मुख्य रस्त्यावर वाहने लावतात.त्याचा परिणाम सुद्धा वाहतूक समस्येवर होत असतो.या लग्न सराई दरम्यान आळंदी शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या येऊ नये यासाठी वाहतूक प्रशासनाने योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी आळंदी ग्रामस्थांनी केली आहे.