माजी खा.दिलीप गांधी ः आनंद विद्यालयात योग विद्या धाम तर्फे योगदिन
नगर -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन सुरु करुन संपूर्ण जगाला आपली वैभवशाली परंपरा असलेली योगासनाचे महत्व पटवून दिले आहे. त्यामुळे आज 177 देशांमध्ये योगासने केली जात आहेत. पाचव्या आंतरराष्ट्री योग दिनानिमित्त सर्वत्र योगामय वातावरण झाले आहे.
नगरमध्येही मोठ्या प्रमाणात उत्साहात नागरिक या उपक्रमात सहभागी झाले आहेत. नगरमध्ये अनेक वर्षांपासून योग विद्या धाम योगाच्या प्रचार व प्रसारासाठी महत्वपूर्ण भुमिका बजवत आहे. योग विद्या धामच्या शास्त्रोक्त योगासनाच्या प्रशिक्षणामुळे आज हजारो नागरिक स्वास्थ्य जीवन जगत आहेत, असे प्रतिपादन अर्बन बॅंकेचे अध्यक्ष व माजी. खा.दिलीप गांधी यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गुलमोहोर रोडवरील आनंद विद्यालयात नगर अर्बन बॅंकेच्या सहकार्याने व योग विद्या धामच्या मार्गदर्शनाखाली योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अर्बन बॅंकेचे अध्यक्ष दिलीप गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, अर्बन बॅंकेचे संचालक दिपक गांधी, उद्योगपती मोहन मानधना, अशोकराव सोनवणे, योग विद्या धामचे अध्यक्ष सुंदर गोरे, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, कार्याध्यक्ष जयंत वेसीकर, मीना देशपांडे, किशोर फिरोदिया, संदिप मुळे, कृष्णाजी बागडे, पुरुषोत्तम उपाध्ये, आदिंसह अर्बन बॅंकेचे प्रमुख व्यवस्थापक सतीश रोकडे, एम.पी. साळवे आदिंसह विविध क्षेत्रातील नागरिक महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी योग विद्या धामच्या योग प्रशिक्षकांनी शास्त्रोक्त योगासनाचे धडे उपस्थितांना दिले. उपस्थित सर्व मान्यवरांनीही या उपक्रमात सहभागी होवून योगासने केली. योग विद्या धामचे 10 साधक 20 ते 25 मिनिटे वेगवेगळ्या योगासनाच्या स्थितीत थांबून स्थिर सुखम आसनं चे प्रात्याक्षिक केले.
आभार मानतांना कृष्णाजी बागडे म्हणाले, योग विद्या धाम गेल्या अनेक वर्षांपासून नि:स्वार्थपणे योग क्षेत्रात काम करत आहे. गेल्या 5 वर्षांपासून मोठ्या उत्साहात शहरात विविध ठिकाणी योग वर्गाचे आयोजन करत आहोत.
आनंद विद्यालयात होणाऱ्या या भव्य स्वरुपात योग महोत्सवाला नगर अर्बन बॅंक सहकार्य करत आहेत. बॅंकेचे अध्यक्ष दिलीप गांधी मोठ्या उत्साहात या उपक्रमात दरवर्षी सहभागी होत असतात. कार्यक्रमाचे प्रास्तविक दत्ता दिकोंडा यांनी केले, सूत्रसंचालन राजन कुमार यांनी केले.