नगर,(प्रतिनिधी) – जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळांची तीव्रता विलक्षण वेगाने वाढू लागली आहे. सध्या पाणीपुरवठा करणार्या टँकरची संख्या १११ वर पोचली आहे. जिल्ह्यातील २ लाख ८ हजार १६० लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक टँकर संख्या आहे, ती पाथर्डी तालुक्यात. एकट्या पाथर्डी मध्ये ४२ टँकरमार्फत ६३ हजार 16 नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे.
मागील आठवड्यात जिल्ह्यातील पाण्याच्या टँकरची संख्या 76 होती. त्यात शुक्रवार (दि.५) अखेर टँकच्या प्रमाणात वाढ झाल्याने सरकारी पाण्याचे टँकरची संख्या १११ वर पोहचली आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गावोगावचे तलाव, साठवन बंधारे कोरडेठाक पडू लागले आहेत.
विहिरींची पाण्याची पातळीही खालावली आहे. जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या प्रकल्पातून एकूण ३९ टक्केच पाणी साठा शिल्लक राहिलेला आहे. गेल्यावर्षी तो ६३ टक्के होता. पाण्याचे स्रोत, उद्भव आटू लागल्याने त्याचा परिणाम पाणीयोजनांवर होऊ लागला आहे.
जिल्ह्यात गेल्या १३ फेब्रुवारीच्या सुमारास टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करावा लागला होता. जिल्ह्यातील टंचाईच्या झळा वाढल्याने पावणेदोन महिन्यातच पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करणार्या टँकरची संख्या १११ वर पोहोचली आहे. अद्याप टंचाईचा पुढील अडीच-तीन महिने सामना करायचा आहे. जिल्ह्यात एकूण ११४ गावे ५६८ वाड्या वस्त्यांना टँकरने पुरवठा केला जात आहे.
संगमनेर तालुक्यात १९ गावे, ५२ वाड्यावस्त्यांवरील 24 हजार 217 लोकसंख्येला १३ टँकरमार्फत, अकोल्यात एक टँकर, नगर तालुक्यात ११ गावे व 30 वाड्यावस्त्यावरील १२ हजार ७६६ लोकसंख्येला ७ टँकरने, कर्जतमधील २१ गावे १२४ वाड्यावस्त्यांवरील ४३ हजार ४०० नागरिकांना २० टँकरने, जामखेडमधील ८ गावे ३२ वाड्यावस्त्यांना १० टँकरमार्फत श्रीगोंद्यातील ५ गावे, ५१ वाड्यावस्त्यावरील १० हजार लोकसंख्येला ८ टँकरमार्फत पाणीपुरवठा सुरू आहे. याशिवाय पाथर्डी पालिका हद्दीत २५ वाड्यावस्त्यांना एका टँकरमार्फत पाणीपुरवठा सुरू आहे.
टंचाई निवारण कक्षाचा विसर!
जिल्हयातील टंचाईचे बहुतांश नियंत्रण जिल्हा परिषदेतून होते. यासाठी दरवर्षी टंचाई सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेत स्वतंत्र टंचाई नियंत्रण कक्षाची स्थापना केली जाते. त्यासाठी सदस्य, पदाधिकारी आग्रही असतात. मात्र, प्रशासकीय राजवट सुरू झाल्यानंतर प्रशासनाला हा कक्ष सुरू करण्याचा विसर पडला आहे. सद्यःस्थितीत जिल्हयात १११ टॅंकरव्दारे ११४ गावांना पिण्याचा पाण्यासाठी टॅंकर सुरू आहे. असे असतानाही प्रशासनाने टंचाई नियंत्रण कक्ष कार्यान्वित नसल्याचे दिसत आहे.