वाई: विकास कामात राजकारणाला थारा न देणारी शिवसेना नेहमीच 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण करीत असते, अशी शिकवण हिंदूहृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची असल्याने वाई तालुक्यात विकास कामांचा झपाटा चालू केला आहे. वाई तालुक्याचा विकास फक्त शिवसेनाच करू शकते असे, प्रतिपादन कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व सांगली, सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे (पाटील) केले. बावधन येथील बसस्थानकाचे भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.
बावधन बसस्थानक उभारणीच्या कामाला शिवसेनेचे विवेक भोसले व पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. त्याला यश आल्याने राज्याचे परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते यांच्या फंडातून 16 लाख पन्नास हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने या कामाचा व बावधनमधील विविध विकास कामांचा शुभारंभ, छ. शिवाजी महाराज चौक ते कणूर रस्ता डांबरीकरण, भैरवनाथ मंदिर येथील हॅंमॅक्स लॅम्प लोकार्पण प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. महिला जिल्हा संघटक सौ. शारदा जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश शिंदे, तालुकाध्यक्ष अनिल शेंडे, संतोष भोसले, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले, वाईशहर प्रमुख गणेश जाधव, हनुमंत कचरे, संजय कोहिले, विवेक भोसले, किरण खामकर, कोमल गांधी, अनिल शेंडे, विजय बडे, तानाजी पिसाळ, दिलीप पवार, बेबी राजपुरे, विशाल राजपुरे, प्रदीप भोसले, प्रकाश जाधव, किसन राजपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. नितीन बानुगडे पाटील म्हणाले, जिल्हा नियोजन समितीतून लाखो रुपयांचा निधी वाई तालुक्यातील विकास कामांसाठी टाकण्यात आला आहे, 1995 साली युतीच्या शासन काळात अपक्ष आप्पानी सूतगिरणी, नागेवाडी धरणाची उभारणी करण्यात आली. परंतु धरणाच्या कालव्यांचे काम अपूर्णच राहिले, शिवारात पाणी खळखण्यासाठी युतीच्या उमेदवाराला निवडून आणा, 2020 मध्ये पोटपाटासाठी 1 कोटी 70 लाख तरतूद करणार असेही आश्वासन पाटील यांनी दिले.
पाटील म्हणाले, गेली कित्येक वर्षात प्रस्थापितांनी जनतेला भुलवीत ठेवण्यापलिकडे काहीही केले नाही. प्रत्येक गावात दोन गट पाडून भावा-भावात भांडणे लावण्यापलीकडे तालुक्याच्या आमदारांनी काय दिवे लावले. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र राज्यातील युती सरकारच्या माध्यमातून आलेल्या निधीवर स्वतःच्या पक्षाचा निधी असल्याचा अविर्भाव आणून जनतेची दिशाभूल करण्यापलीकडे त्यांना काही विकास करता आला नाही, अशी खरमरीत टीका ही बानुगडे-पाटील यांनी केली. यावेळी महेश शिंदे, सौ. शारदा जाधव, यशवंत घाडगे, अनिल शेंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळशीदास पिसाळ यांनी केले. विवेक भोसले यांनी आभार मानले.