देगाव शेतकरी हक्क संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
भुईंज – शिरगाव, ता. वाई येथील कवठे-केंजळ उपसा जलसिंचन योजनेचे काम वनविभागाने सुरू करून न दिल्यास आत्मदहन करू, असा इशारा देगाव येथील शेतकरी हक्क संघटनेचे अध्यक्ष युवराज जनार्दन गोळे यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
कवठे-केंजळे योजनेचे शिरगाव येथे सुरू असलेले काम हे वनविभागाच्या हद्दीत वन विभागाच्या परवानगीशिवाय असल्याचे कारण पुढे करत वनविभागाने हे काम बंद पाडले आहे. तसेच कामाचे साहित्यही जप्त केले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल देगाव तालुका वाई येथील शेतकरी हक्क संघटनेने घेतली असून तत्काळ हे काम सुरू करू न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व अध्यक्ष असलेले युवराज जनार्दन गोळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
कवठे केंद्र ही योजना शिरगाव देगाव येथील पाण्यापासून वंचित असलेले गावे असून त्यांच्या शेतीसाठी व कोरडे पडलेल्या पाझर तलावांमध्ये या योजनेच्या पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचणार होते. पण वनविभागाने काम बंद पडल्याने ही गावे पाण्यापासून वंचित राहिल्याने हजारो हेक्टर जमिनीवरील पीके जळून खाक झाली आहे. दिवसेंदिवस उन्हाच्या तीव्रतेमुळे उष्णतेचा पारा चाळीस-बेचाळीस अंशावर पोचल्याने मुक्या जनावरांना पिण्याचे पाणी व चारा नसल्याने लाख रुपये किंमतीचे असणारे जनावरे त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या या दुष्काळ ग्रस्त गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वनविभागाचा मनमानी कारभार मोडीत काढण्यासाठी शेतकरी हक्क संघटनेच्या अध्यक्ष युवराज जनार्दन गोळे यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.