सातारा – पाण्याच्या शोधात असलेला कोल्हा काल गणेशवाडी येथील बबन साळुंखे यांच्या विहिरीत पडला. ही बाब वन अधिकारी यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ या कोल्ह्याला विहिरीतून बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले.
अधिक माहिती अशी, बुधवार, दि. 15 रोजी दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या शोधात आलेला कोल्हा हा गणेशवाडी येथील बबन भाऊ साळुंखे यांच्या विहिरीत पडला. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच तत्काळ वनक्षेत्रपाल (प्रा.) सातारा शीतल राठोड, दत्तात्रय गीते, वनपाल परळी, महेश सोनावले, वनरक्षक कुसावडे, वनरक्षक ठोसेघर राज मोसलगी, वनरक्षक परळी श्रीकांत वसावे हे घटनास्थळी पोहचले.
स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अथक प्रयत्न करूनही कोल्हा विहिरीतून बाहेर काढता येत नव्हता. शेवटी धाडसी वनरक्षक राज मोसलगी हे स्वतः दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरले. विशेष बाब म्हणजे या विहिरीचे बांधकाम झालेले नाही आणि खाली उतरण्यासाठी विहिरीला पायऱ्यादेखील नाहीत. अशा बिकट परिस्थितीत वनरक्षक राज मोसलगी यांनी जीवाची बाजी लावून विहिरीत उतरले आणि शिताफिने कोल्ह्यास अलगद जाळीत अडकवून त्यास विहिरीबाहेर काढण्याचे यशस्वी काम केले. उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, साहाय्यक वनसंरक्षक विश्वास भडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच गणेशवाडीतील नेहरू युवा मंडळाच्या युवक कार्यकर्ते आकाश पवार, चिंतामणी काळे, बाबुराव चव्हाण यांच्या मदतीने कार्यवाही पार पाडण्यात आली.