श्रीगोंदा – स्वतःच्या आई-वडिलांवर उपकार करू शकत नाही, ते काय जनतेवर उपकार करणार ? या महाशयांनी आणि त्यांच्या पिताश्रींनी स्थानिक नागरिकांवर केलेल्या अन्यायाची यादी वाढतच चालली आहे. सामान्य जनतेच्या अन्नात माती कालवून स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेतले, असा घणाघाती आरोप उमेदवार संग्राम जगताप यांनी विरोधी उमेदवारावर केले. श्रीगोंदा तालुक्यात आ. जगताप यांनी विविध गावांत सभा घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, या महाभागांनी वाट्टेल त्या थराला जाण्याचा उद्योग केला. शिर्डीतील राजेंद्र गोंदकर यांच्या सारख्या अनेक नागरिकांची फसवणूक केले. या सर्वांवर झालेल्या अन्यायाची सखोल चौकशी करण्याची निवडणुकीनंतर शासनाकडे मागणी करणार आहे.
शहरी भागातील आमदार असतानाही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी विधानसभेचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे मला निलंबित करण्यात आले. मात्र दुसरीकडे आयत्या बिळावरचे नागोबा असलेल्या या विरोधी उमेदवाराला शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणे घेणे नाही. यांना कॅबिनेट मंत्रिपद, जि. प. अध्यक्षपद, विरोधी पक्षनेतेपद देऊनही ही अप्पलपोटी मंडळी कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता व पदासाठी जातीयवादी भाजपलाच जाऊन मिळाले. त्यामुळे या संधीसाधू लोकांना स्वाभिमानी मतदारांनी दक्षिणेत अजिबात अतिक्रमण करु देऊ नये, असे आवाहन आ. जगताप यांनी केले.