-ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांचे मतदारांना आवाहन
पाचगणी – या देशातील सध्याच्या राजवटीने सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याऐवजी आपल्या निर्णयांनी त्यांना पायदळी चिरडण्याचे काम केले. ही जुलमी राजवट हटविण्यासाठी सर्वसामान्यांचे हित जोपासणारे श्री. छ. उदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे लागतील, अशी गरज ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांनी व्यक्त केली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पाचगणीच्या शिवाजी चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बॅंक संचालक राजेंद्र राजपुरे, माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे, नगरसेवक विठ्ठलतात्या बगाडे, दिलावर बागवान, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाबूराव सपकाळ, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष तेजस शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते. राजेंवर प्रेम करणारी ही रयत आहे. देशातील प्रथम क्रमांकाचे विक्रमी मतदान उदयनराजेंना होईल, असा विश्वासही भिलारे यांनी व्यक्त केला.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. ते म्हणाले, जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला देश हुकूमशाहीमुळे धोक्यात आहे. आज सावरलं नाही तर देश अंधकाराच्या खाईत ढकलला जाईल. या देशात पुन्हा लोकशाही प्रस्थापित करून देशाला महासत्तेकडे न्यायचे आहे. या दृष्टीने ही निवडणुक महत्वाची आहे.
सभेस माजी सभापती सुनील काटकर, साहेबराव बिरामणे, नारायणराव बिरामणे, जि.प. सदस्या निता आखाडे, पं.स. सभापती रुपालीताई राजपुरे, नगरसेविका हेमलता गोळे, पृथ्वीराज कासुर्डे, विजय भिलारे, शेखर कासुर्डे, रेखाताई कांबळे, विठ्ठलराव गोळे, विठ्ठलराव बगाडे, विजयराव भिलारे, प्रवीण भिलारे, ऍड. विकास पवार, बाळासाहेब चोरगे तसेच नागरिक उपस्थित होते.