जयंतीदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
पुणे – “ज्या उदात्त हेतूने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहिली या घटनेतील मूल्यांना भाजपने गेल्या पाच वर्षात तिलांजली देण्याचे काम केल्याची टीका कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांचे उमेदवार मोहन जोशी यांनी शनिवारी येथे केली.
डॉ. आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जोशी यांनी आदरांजली वाहिली. महापालिकेतील विरोधपक्ष नेते अरविंद शिंदे, अविनाश बागवे, रजनी त्रिभुवन, लता राजगुरू, सुजीत यादव, राहुल तायडे यावेळी उपस्थित होते.
जोशी म्हणाले, भाजपने केवळ तोंडदेखलेपणासाठीच डॉ. आंबेडकरांच्या नावाचा वापर केला. या साऱ्या गोष्टींचा जाब जनता विचारत असून या निवडणुकीत त्याची जबर किंमत भाजपला मोजावी लागेल.
तिळवळ तेली समाजाला न्याय मिळवून देणार
महाराष्ट्रातील ओबीसीमध्ये असणाऱ्या तीळवन तेली समाजाला यापुढे निश्चितच राजकीय न्याय दिला जाईल, असे आश्वासन मोहन जोशी यांनी दिले. समाजाचा वधू-वर मेळावा आज कोथरूडमधील आशीष गार्डन येथे पार पडला. यावेळी जोशी यांनी या समाज बांधवांशी संवाद साधला. तसेच जगद्गुरू संताजी महाराज जगनाळे यांचे चांगले स्मारक पुण्यात होण्यासाठी मी प्रयत्न करेल, अशी ग्वाही यावेळी जोशी यांनी दिली. यावेळी संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय डहाके उपस्थित होते.
सुप्रिया सुळेंसोबत संयुक्त प्रचार
जोशी यांनी रविवारी सकाळी तळजाई टेकडी येथे जाऊन सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांची भेट घेतली. त्यावेळी बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांनी देखील मतदारांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर पद्मावती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी वंदन केले. यावेळी सुभाष जगताप उपस्थित होते.
मोदींनी अर्थ व्यवस्था मातीत घातली- बी.जी कोळसे पाटील
मोदी रात्रंदिवस खोटे बोलत आहेत. देश संकटात आहे. देशाला या संकटातून सोडविण्यासाठी मोदींचा खरा चेहरा लोकांना सांगितला पाहिजे. चुकीच्या धोरणामुळे आणि आकड्यांच्या फेकाफेकीने मोदींनी देशाची अर्थव्यवस्था मातीत घातली आहे, अशी परखड टीका निवृत्त न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील यांनी शनिवारी केली. मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस आघाडीच्या वतीने टिळक वाड्यात लोकायतच्या वतीने “मोदी सरकारची पाच वर्षे’ विषयावरील चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, मनसेच गटनेते वसंत मोरे, किशोर शिंदे, इंटकचे सुनील शिंदे, रविंद्र माळवदकर, नरेंद्र व्यवहारे, रिपब्लिकन कवाडे गटाचे प्रकाश भालेराव, संजय बालगुडे यावेळी उपस्थित होते.