सुपे येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आवाहन
बारामती/सुपे – बारामतीतील घराणेशाही उलथवून टाकायची आहे. दुष्काळ कायमचा नष्ट करायचा असेल तर बारामतीमध्ये पतीवर्तन झालेच पाहिजे. तुम्ही परिवर्तन करा; येथेही पिण्याचे आणि शेतीकरिताचे पाणी घेऊन येईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना आवाहन केले.
सुपे (ता. बारामती) येथे युतीच्या उमेदवार कांचन कूल यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार राहुल कुल यांच्यासह भाजप, शिवसेनेचे मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, सुपे येथील सभेकरिता जमलेला जनसमुदाय पाहून पवारांच्या घरातील सर्वांची झोप उडेल. येथील जनसागराच्या मतांचा पाऊस पाडू, या लोकसभेचा निकाल यापूर्वीच लागला आहे. राष्ट्रवादी ही पराजित झालेली टीम आहे. त्यांच्या कॅप्टनने बॅटिंग सुरू करण्याअगोदरच माघार घेतली आणि त्याचवेळी निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला.
प्रत्येक निवडणुकीसाठी पाण्याचे आश्वासन देऊन पवार मते मिळवितात; परंतु, तो जमाना आता राहिलेला नाही. आजपर्यंत या भागाला पाणी का दिले नाही, असा सवालही करीत या भागाला पाणी आणण्यासाठीची ही निर्णायक निवडणूक असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
तुम्ही काय केले ते सांगा
स्वातंत्र्यापासून 32 लाख हेक्टर असणारी सिंचन क्षमता आम्ही पाच वर्षांत 40 लाख हेक्टरवर नेली. सिंचनाच्या कमी दराच्या निविदा स्वीकारत, त्यातून शासनाचे 400 कोटी वाचवले. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर समाजाला अनेक वर्षे फसवणारी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आता आम्हाला जाब विचारते. आम्ही या समाजाला आदिवासींप्रमाणे सवलती दिल्या. आमच्यावर टीका करण्यापूर्वी तुम्ही काय केले ते सांगावे, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिले.