बियाण्याचे अव्वाचेसव्वा दर; लागवडीचा खर्च एकरी लाखोंच्या घरात
नितीन साळुंखे
नागठाणे – गेल्या दोन तीन वर्षांपासून “आले’ उत्पादक शेतकरी यांच्यात पडलेल्या दराने मरगळ आलेली होती. पण या वर्षी चालू असणाऱ्या बाजार पेठेच्या वाढत्या दराने बियाण्याच्या दरातही कमालीची वाढ झाली असून यामुळे आले लागवडीचा खर्च एकरी लाखो रुपयांच्या घरात गेला असून हा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्या बाहेर आहे. तर पारंपरिक आले उत्पादक शेतकऱ्यांचे वाढत्या दराने समाधानाचे वातावरण आहे.
गत तीन चार वर्षांपासून आले दरात आलेली घसरणीने शेतकरी वर्गात कमालीचे नाराजीचे वातावरण होते. दर, वाढत्या भांडवली खर्चाने, पाण्याच्या अभावामुळे बहुतांशी शेतकऱ्यांना आल्याच्या पिकाकडे दुर्लक्ष केले होते. मात्र यावर्षी याचा नेमका परिणाम म्हणून आल्याच्या दरात भरघोस वाढ झाली असून सुमारे 500 किलोच्या मालाला बाजार पेठेत पंचवीस ते तीस हजार रुपये दर मिळत आहे. तर बियाण्यासाठी 35 ते चाळीस हजार रुपये प्रती 500 किलो असा दर आहे.
आले लागवड करण्यासाठी एकरी सुमारे हजार ते पंधराशे किलो बियाणे लागत असून याचा खर्च लाखाच्या वर जात आहे तर पाणी व्यवस्थापन करण्यासाठी एकरी 35 ते 40 हजार रुपये खर्च येत आहे. खते, औषधे, मशागत याचा खर्च लाखाच्या वर जात आहे. यामुळे साधारणपणे आले लागवडी साठी एकरी 2 ते अडीच लाख इतका खर्च येत आहे. हा खर्च सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असून या वर्षी आले उत्पादक सामान्य शेतकरी हा खर्च पाहून या वर्षी नवीन आले लागवड नको असे म्हणत आहेत तर पारंपरिक आले उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला मागणी पहाता मिळत असलेल्या दराने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर दिसत आहे.