नवी दिल्ली – खनौरी सीमेवर बुधवारी झालेल्या एका तरुणाच्या मृत्यूनंतर शेतकऱ्यांनी आपला दिल्ली मोर्चा तातपूर्ता थांबविला आहे. असे असले तरी या घटनेनंतर शेतकरी संघटनांनी आपसांत बैठका घेत आपल्या अंदोलनाची पुढील दिशा ठरवली आहे.
त्यानुसार शेतकरी किसान मोर्चा उद्या (२३ फेब्रुवारी) काळा दिवस म्हणून पाळणार आहे. तर त्यानंतर २६ फेब्रुवारीला ट्रॅक्टर मोर्चा व १४ मार्चला रामलीला मैदानावर अंदोलन असे नियोजन शेतकऱ्यांच्या वतीने आखान्यात आले आहे.
आंदोलनाच्या १०व्या दिवशी शंभू आणि खनौरी सीमेवर परिस्थिती सामान्य आहे. खनौरी सीमेवर बुधवारी म्हणजेच २१ फेब्रुवारी रोजी शेतकरी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. येथील तरुण शेतकरी शुभकरन सिंह यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गुरुवारी शेतकऱ्यांनी शुभकरन यांचा फोटो काढून घोषणाबाजी केली.
तसेच, किसान मजदूर मोर्चाचे (केएमएम) समन्वयक सरवन पंढेर यांनी गुरुवारी एक छायाचित्र जारी केले, ज्यामध्ये पोलिस गोळीबार करताना दिसत आहेत. त्यावर पंढेर म्हणाले की, या छायाचित्रावरून थेट गोळीबार झाल्याचे दिसून येत आहे. पंजाब सरकारने हल्लेखोरांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
तर पोलिसांनी आमच्या छावण्या आणि ट्रॅक्टरवर हल्ला केला. तर १६७ शेतकरी जखमी झाले आहेत. ६ बेपत्ता आहेत, अशी माहिती शेतकरी नेते बलदेव सिंह यांनी दिली आहे.
तसेच, पंजाब भाजपचे अध्यक्ष सुनील जाखड यांच्या घराबाहेरील आंदोलन शेतकऱ्यांनी संपवले आहे. भारतीय किसान युनियन तर्फे येथे आंदोलन करण्यात आले होते.
शुभकरण यांना शहीद दर्जा द्यावा
खनौरी सीमेवर शहीद झालेल्या तरुण शेतकरी शुभकरणला पंजाब सरकारने शहीद दर्जा द्यावा, असे शेतकरी नेते जगजित डल्लेवाल यांनी म्हटले आहे. केंद्र आणि हरियाणाशी आमचा संघर्ष आहे, मात्र पंजाबच्या सीमेत घुसून आमच्यावर हल्ला करणाऱ्या हरियाणा पोलिसांवर पंजाब सरकारने कारवाई करावी, असेही ते म्हणाले.
तसेच याप्रकरणी आता पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मोहालीचे वकील हरिंदर सिंग यांनी अश्रुधुराच्या गोळ्या आणि पेलेट गनवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणी हायकोर्टात २९ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.