छत्रपती संभाजीनगर – ब्रिटिश सरकारने फेब्रुवारी १८८१ मध्ये संपूर्ण भारतात जनगणना केली. त्यानुसार एकट्या सध्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ७३०,९७६ लोकसंख्येच्या ४०.६३ % कुणबी मराठे होते. विशेष म्हणजे यात मुस्लिमांची संख्या ही १०.७६% होती, असा दावा निवृत्त सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ लेखक, संशोधक, इतिहास अभ्यासक विश्वास पाटील यांनी केला आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारणारे मनोज जरांगे आणि स्वतः महाराष्ट्र सरकार त्यांना टिकणारे आरक्षण दिले म्हणत आहे. त्याला कारण या नोंदी असल्याचे समजते.
गेल्या दोन अडीचशे वर्षात मराठवाड्यातील जनतेने मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केलेले नाही. एखादा महायुद्धाचा हिरोशिमा नागासाकी सारखा प्रकारही इकडे घडलेला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणूनच अद्यापी गाववार आढावा घेतल्यास कुणब्यांच्या अनेक नोंदी आढळतील, असा दावाही त्यांनी केला. विशेष म्हणजे याचे पुरावे थेट दिल्ली कार्यालयात असतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
विश्वास पाटील म्हणाले की, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे १८८४ च्या आधी सुद्धा डॉक्टर ब्रॅडले आणि कंपनीने १८४० च्या दरम्यान एक सर्वे केला होता. ब्रिटिशांनी म्हटल्याप्रमाणे तो एका ब्रिटिश कंपनीने केलेला सर्वे सुद्धा सत्याच्या जवळपास जाणार होता. जुलै १८८४ मध्ये ब्रिटिशांनी हैदराबादहून औरंगाबाद जिल्ह्याचे गॅझेटियर प्रकाशित केले आहे. त्यानुसार त्यांनी सुद्धा ब्रेडले साहेबांच्या कागदपत्रांचा चांगला उपयोग करून घेतलेला आहे. माझ्या मते या संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे सेंसेसचे जे दिल्ली येथे मुख्य कार्यालय आहे तेथे मिळायलाच हवीत.
थोडक्यात ब्रिटिशांनी शास्त्रशुद्धरित्या संपूर्ण देशभर हिंदुस्तानभर जो सर्वे केला होता. जो सर्व जाती-जमातीचा धर्मांचा व व्यावसायिकांचा सुद्धा होता. त्यानुसार आजच्या औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील ४०% हून अधिक लोक हे कुणबी होते. त्यामुळे त्यांचे तेवढे लोकसंख्येच्या प्रमाणात आजही प्रमाण आढळयलाच हवे, असा दावाही पाटील यांनी केला आहे.
राज्य विभाजनाचा फटका
मराठवाडा विभागामध्ये औरंगाबाद सोडून इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा याच पद्धतीने थोडीफार जनसंख्या असायला हवी. मी अगदी हैदराबाद येथेच सुद्धा जाऊन तिथल्या दप्तरखान्यातून शोध घेतला. परंतु आता आंध्र प्रदेशाचे दोन तुकडे झालेले आहेत. पूर्वीचे रेकॉर्ड एका जागी नाही. त्यामुळे प्रयत्न करूनही मला मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांचे ब्रिटिश गॅझेटियर मिळालेले नाहीत. मात्र, औरंगाबाद व जालन्याची परिस्थिती लक्षात घेता, ब्रिटिशांच्या नोंदीनुसार मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यातून सुद्धा बहुसंख्येने कुणब्यांच्या नोंदी आढळयलाच हव्यात, असेही पाटील पुढे म्हणाले.
ब्रिटिशांच्या १८८४ गॅझेटनुसार
– कुणबी मराठः एकूण २८८,८२५(पुरुष-१४७५४२, स्त्रिया-१४१२८३)
– मुसलमानः एकूण ७८,६८८(पुरुष-३९८१९,स्त्रिया ३८८६९)
– माळीः एकूण २८,४०३(पुरुष- १४४३०, स्त्रिया १३९७३)
– महारः एकूण ६५५२९(पुरुष- ३२६३५, स्त्रिया- ३२८९४)
– धनगरः एकूण ३१९३१(पुरुष १६२१०, स्त्रिया-१५७२१)