Delhi Lok Sabha Election। लोकसभा निवडणुकीत काही जागांची चर्चा जोरदारपणे होताना दिसून येत आहे. त्यातच दिल्लीत लोकसभेच्या केवळ सात जागा असल्या तरी येथील निकालांची चर्चा देशभर होते. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने सर्व सात जागा जिंकल्या होत्या. गेल्या वेळी तर भाजपने सर्व सातही जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मते मिळवून यश प्राप्त केले. विधानसभेत आपने यश मिळवले तरी, लोकसभेला भाजपनेच बाजी मारली. या निवडणुकीत काँग्रेस तसेच आम आदमी पक्षाने आघाडी करत भाजपला आव्हान दिले.
दिल्लीत केजरीवाल विरुद्ध भाजप Delhi Lok Sabha Election।
दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरुद्ध भाजप असाच थेट सामनाच सध्या सुरु आहे. कारण दिल्लीतील मद्य धोरणावरून आम आदमी पक्षाचे बडे नेते कारागृहात आहेत. केजरीवाल यांनाही प्रचारासाठी जामीन मिळाला. त्यातच पक्षाच्या खासदार स्वाती मालिवाल प्रकरणावर केजरीवालांनी मौन बाळगल्याने भाजपला आयती संधी मिळाली. तरीही दिल्लीत केजरीवाल यांना टक्कर देईल असा स्थानिक नेता भाजपकडे नाही. या लोकसभा निवडणुकीत अटकेमुळे केजरीवाल यांना सहानुभूती मिळणार काय, हा प्रश्नच आहे. त्यामुळे भाजप धास्तावलेला आहे.
भाजपकडून सहा जागांवर उमेदवार बदल
भाजपने पूर्वीच्या सात खासदारांपैकी केवळ मनोज तिवारी यांनाच पुन्हा संधी दिली. उर्वरित सहा जागांवर नवे उमेदवार दिले. विद्यमान खासदारांबाबत नाराजीचा फटका बसू नये म्हणून पक्षाने हे बदल केले. पूर्व दिल्लीत पक्ष संघटनेत कार्यरत असलेले हर्ष मल्होत्रा यांना संधी दिली. त्यांचा सामना येथे आपचे कुलदीप कुमार यांच्याशी आहे. या मतदारसंघाचे स्वरूप पाहता भाजप ही जागा राखेल असे चित्र आहे. दक्षिण दिल्लीत भाजपने ७१ वर्षीय रामवीर सिंह बिधुरी यांना संधी दिली. त्यांची लढत आपचे सहीराम पेहेलवान यांच्याशी आहे. हे दोन्ही उमेदवार गुर्जर समुदायातील आहेत. हे दोघेही आमदार आहेत. दाट लोकसंख्या हे या मतदारसंघाचे वैशिष्ट्य. एकीकडे श्रीमंतांच्या वसाहती, तसेच सरकारी कर्मचाऱ्यांची वस्ती तसेच झोपडपट्टीचा भागही येथे मोठ्या संख्येने येतो. त्यामुळे येथील नेमका अंदाज वर्तवता येत नाही.
विरोधकांना विजयाची आशा Delhi Lok Sabha Election।
पश्चिम दिल्ली मतदारसंघात आम आदमी पक्षाचे नेते महाबळ मिश्रा हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने कमलजीत सेहरावत यांना उमेदवारी दिली. मिश्रा हे दिल्लीच्या राजकारणात मुरब्बी मानले जातात. पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. त्या तुलनेत भाजपच्या उमेदवार या नगरसेविका आहेत. दिल्ली महापालिकेतीलच कामाचा त्यांना अनुभव आहे. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. ७० वर्षीय मिश्रा यांनी २००९ मध्ये येथून विजय मिळवला असून, प्रामुख्याने या मतदारसंघात पारंपरिक शेती तसेच दुग्ध व्यवसायाशी संबंधित मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत. मिश्रा हे बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील आहेत. या मतदारसंघातील सर्व दहा आमदार आम आदमी पक्षाचे आहेत. त्यामुळेच विरोधकांना या मतदारसंघात अपेक्षा आहेत.
व्यापाऱ्यांच्या नेत्यांची कसोटी
क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान मतदारसंघ असलेल्या चांदनी चौक या मतदारसंघात भाजपने व्यापाऱ्यांचे नेते प्रवीण खंडेलवाल यांना संधी दिली. येथून ज्येष्ठ नेते डॉ. हर्षवर्धन यांना पक्षाने डावलले. खंडेलवाल यांचा सामना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ७९ वर्षीय जे. पी. अग्रवाल यांच्याशी आहे. अग्रवाल यांची ही दहावी लोकसभा निवडणूक. यापूर्वी १९८४ तसेच १९८९ तसेच १९९६ मध्ये या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांचाही येथील व्यापारी समुदायावर पगडा आहे. भाजपने या मतदारसंघात हिंदुत्वावर भर दिलाय. तर काँग्रेस-आपने वस्तू व सेवा कराच्या मुद्द्यावर व्यापाऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालवलाय. येथे व्यापारी समुदायातील मतांचे महत्त्व लक्षात घेता, त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या दोन नेत्यांमध्ये ही झुंज चुरशीची आहे. एकूणच दिल्लीत भाजपविरोधात काँग्रेस तसेच आप एकत्र आले असल्याने राजधानीतील चित्र पाहता विरोधकांना एक ते दोन जागा जिंकता येतील असा अंदाज वर्तवला जात आहे.