मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षातील काही नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाले. एक म्हणजे अजित पवार गट आणि दूसरा म्हणजे शरद पवार गट. यातील काही नेते आणि कार्यकर्ते हे शरद पवारांचे समर्थक आहेत. तर काहींनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. अशातच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील बंडखोर आमदारांना पुन्हा पक्षात घेणार का? असा सवाल अनेकांच्या मनात आजही आहे. यावर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
रविवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी शरद पवार यांनी संवाद साधला. यावेळी ते अजित पवार यांच्या गटाबाबत म्हणाले की, “कळत नकळत आपल्यातील काही सहकारी हळूच एक शंका काढतात. आता झाले ते ठीक आहे, आम्ही कामाला लागत आहोत, परंतु, ते परत आल्यावर काय? अशी शंका मला आजही अनेकांकडून विचारली जाते. ते आता तुम्ही डोक्यातून काढून टाका. आपण यासंबंधीचे निर्णय घेणार नाही.”
पुढे ते म्हणाले, “संकटाच्या काळात जे मजबुतीने उभे राहिले, ते खरे आणि त्यांच्या पद्धतीने निवडणुकीला जावे लागेल. दरम्यान, शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार गटातील नेत्यांचा राष्ट्रवादी पक्षात परतण्याचा मार्ग बंद झाला आहे, असा अंदाज लावला जात आहे.
दरम्यान, यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला आहे. “देशाचे नाव बदलण्याचा इतका अट्टाहास केंद्र सरकारला का आहे? बदलायचे असेल तर मग आता गेटवे ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बॅंकेचे देखील नाव बदला. G20 सारख्या परिषदा यापूर्वी दोनदा आपल्या देशात झाल्या. एकदा इंदिरा गांधी या पंतप्रधान असतानाही ती झाली होती. पण त्यावेळी आज ज्या पद्धतीचं वातावरण होते, तसे नव्हते. त्यावेळी देखील जगातले लोक भारतात आले होते. जगातले राष्ट्रपती आपल्या देशात येतात त्यांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे. पण यामुळे मूलभूत प्रश्न सोडून काही ठराविक लोकांचा मोठेपणा दाखवण्यात आला आणि याची चर्चा आज ना उद्या त्या देशांत नक्की होईल,” असेही शरद पवार म्हणाले.