जालना : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मागील13 दिवसांपासून मनोज जरांगे उपोषण करत आहेत. दरम्यान, त्यांच्या उपोषणाचा आजचा 14 वा दिवस असून त्यानी आपले उपोषण आणखी तीव्र केले आहे. मनोज जरांगे यांनी कालपासून उपचार आणि पाणीदेखील बंद केला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 14 दिवस असून, कालपासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जरांगे यांनी कालपासून पाणी प्राशन केले नाही. त्यासोबतच त्यांनी सलाईनही काढून टाकले आहे. तसेच जरांगे यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर ते ठाम आहेत. यामुळेच त्यांनी राज्य सरकारचा दुसरा जीआर देखील फेटाळला आहे. मराठा समाजाने गावोगावी शांततेनं साखळी उपोषण करावं, असे आवाहन देखील जरांगेंनी केले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारकडून आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे. या बैठकीत राज्यातील सर्व महत्त्वाच्या पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीसाठी शरद पवार गटाकडून राजेश टोपे तर ठाकरे गटाकडून अंबादास दानवे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमका काय तोडगा निघणार? याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषण करत आहे. तसेच मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. तर दुसरीकडे ज्यांच्याकडे वंशावळ म्हणजेच निजामकालीन कुणबी असल्याची नोंद असेल, अशा लोकांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने केली. मात्र, सरकारचा हा प्रस्ताव जरांगे पाटील यांनी नाकारला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे.