मुंबई : भाजप आणि मोदी यांच्याविरोधात आज देशातील जवळपास सर्वच विरोधी पक्ष पाटण्यात एकत्र आले आहेत. विरोधकांच्या या बैठकीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडकून टीका केली. यावेळी त्यांनी घराणेशाहीवरही भाष्य केले आहे. नेते मंडळी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र आल्याचा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला आहे.
यावेळी बोलताना, “सोनिया गांधी यांना राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहे, शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांची चिंता आहे, तर उद्धव ठाकरे यांना आदित्यची चिंता आहे म्हणून ते एकत्र आले आहेत,” असाही टोला त्यांनी लगावला आहे. “भाजप विरोधात विरोधक पाटण्यात एकत्र आले असले तरी ही विरोधकांची वज्रमूठ सैल करण्याचं काम 140 कोटी जनता करेल,” असे वक्तव्यही चंद्रशेखर बावनकुळेंनी केले आहे.
“विरोधकांनी आज एकत्र येऊन मूठ बांधली असली तरी देशाची जनता ओळखून आहे. मला वाटतं 2024 मध्ये संपूर्ण एनडीए 400 पेक्षा जास्त जागांवर यश मिळवेल,” असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. आज संपूर्ण देशाचं लक्ष पाटण्यातील घडामोडींकडे लागलं आहे. विरोधी नेत्यांची भाजपविरोधात मोट बांधण्यासाठी पाटण्यात बैठक सुरु झाली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही विरोधकांची बैठक बोलावली.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी खासदार राहुल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सु्प्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत उपस्थित आहेत. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तसेच तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासह अन्य विरोधी नेते उपस्थित आहेत.