हिंजवडी – महिनाभरापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यात किवळे येथे घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेमुळे संपूर्ण शहर हादरून गेले होते. त्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि उपनगरांतील धोकादायक होर्डिंगबाबत प्रशासन खडबडून जागे झाले. कारवाईची मोहीम हाती घेत शहरात अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा बडगा सुरू केला होता. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी देखील ग्रामपंचायत हद्दीतील धोकादायक होर्डिंग काढून टाकण्याचे आदेश देत ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाला कामाला लावले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे चित्र मुळशीच्या पूर्व भागात दिसून येत आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक अनधिकृत होर्डिंग असलेल्या मुळशी तालुक्यात गटविकास अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावच्या सरपंच, ग्रामसेवकांची बैठक घेत होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, ही कारवाई करायची कुणी आणि केव्हा? हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण ग्रामपंचायतीनी केवळ नोटीस बजाविण्याचे काम केले आहे.
तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या हिंजवडी, माण, मारुंजी, आयटी परिसरात तीनशेहून अधिक अनधिकृत महाकाय होर्डिंग उभारले आहेत. इमारतींवर तसेच वर्दळीच्या रस्त्यांवर, चौकात विनापरवाना उभारण्यात आलेल्या होर्डिंगवर कारवाई कधी केली जाणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मॉन्सूनच्या वादळी वाऱ्यात पुन्हा एखादी मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. किवळेतील दुर्घटनेनंतर प्रशासनाने आयटी परिसरातील सर्व धोकादाय होर्डिंग चालकांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले. प्रत्येकाला नोटीस बजाविल्या आहेत. मात्र होर्डिंगचालकांनी ऑडिट पूर्ण केले की नाही याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे.
आयटी परिसरात प्रामुख्याने जिल्हा परिषद, पीएमआरडीए, एमआयडीसी, महापालिका, पीडब्ल्यूडी आणि ग्रामपंचायत अशा अनेक स्वतंत्र अधिकार असलेल्या स्वायत्त संस्था काम करतात. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडलीच तर जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. कारण एकमेकांकडे बोटे दाखविण्यात व टोलवाटोलवी करण्यात आतापर्यंत या संस्थांचे कामकाज राहिले आहे, असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
मुळशीतील सर्व धोकादाय होर्डिंगबाबत होर्डिंग चालकांनी त्या त्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश त्यांना दिले आहेत. हे ऑडिट पूर्ण झाले की ज्यांचे ज्यांचे ऑडिट पूर्ण आहे त्यांना वगळून इतरांवर कारवाई करण्यात येईल. याबाबतचा अहवाल ग्रामपंचायतीकडून मागविला आहे.
– संदीप जठार, गटविकास अधिकारी, मुळशी.
कारवाईबाबत प्रशासन थंड
हिंजवडीच्या छत्रपती शिवाजी चौकात नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. याच मुख्य चौकात अनेक मोठमोठ्या इमारती व खाली छोटी दुकाने आहेत. या दुकानांवरती महाकाय होर्डिंग धोकादायक पद्धतीने उभे केल्याचे पाहायला मिळत आहे. अशा ठिकाणी जर का काही दुर्घटना घडली तर शेकडो जणांचा बळी जाऊ शकतो. जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतींकडून माहिती मागविली आहे. परंतु अद्याप ठोस कारवाई कोणतीच करण्यात आलेली नाही. या आदेशाला महिना झाला तरी होर्डिंग जैसे-थे आहेत. मात्र तरीही प्रशासन अजूनही कारवाईसाठी वेळकाढूपणा करताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाला जाग केव्हा येणार हे अनुत्तरित आहे.