मुंबई – राज्याच्या सत्तासंघर्ष प्रकरणाचा काय निकाल लागणार?, याकडे राज्यच नव्हे तर अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. शिंदे सरकार राहणार की जाणार ? असा प्रश्नही आता चर्चेत आला आहे. अशात आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सूचक विधान केलं आहे. न्यायालयाने काहीही निर्णय दिला, तरी आम्ही हसत-खेळत निर्णय मान्य करू, असं ते म्हणाले आहेत. नाशिकमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले,’एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत. अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्यांमध्ये मीही आहे, याची मी तुम्हाला आठवण करून देतोय. ज्याला राजकारण करायचं आहे, तो त्याचे ‘प्लॅन’ करत असतो. पण सगळ्याच गोष्टी प्लॅनप्रमाणे घडतात की नाही? हे सांगणं उचित होणार नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्हाला सर्वांना मान्य असेल.” असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.