नवी दिल्ली – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. तसेच यावेळी त्यांनी राम मंदिराच्या निर्माणाची पाहणीही देखील केली. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी सवांद देखील साधला.
शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच अयोध्या दौरा करत आहेत. त्यासाठी ‘चलो अयोध्या..’ असा नारा दिल्याने शुक्रवारी (दि. 7 एप्रिल) ठाणे रेल्वे स्थानकातून विशेष अयोध्या ट्रेन सोडण्यात आली होती. त्या ट्रेनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्या ट्रेनमधून दीड हजारांहून अधिक जिल्ह्यातील शिवसैनिकांनी जय श्री राम आणि शिवसेनाच्या घोषणा देत अयोध्याकडे कूच केली.
दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या दौऱ्यावरून टीका केली होती. आदित्य ठाकरे म्हणाले होते की, आता कलियुग सुरू आहे आणि रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अतिशय मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आदित्य ठाकरेंना अजून खूप शिकायचं आहे. ते जे काही बोलतात त्यावर प्रतिक्रिया देण्याइतकं प्रगल्भ ते बोलत नाहीत. अयोध्येत रामलल्लांच्या दर्शनानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी बातचित केली. यावेळी त्यांनी एका वाक्यात आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिल असल्याचं दिसून आलं.