जामखेड – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम आज नव्याने जाहीर करण्यात आला. त्यानुसार येत्या 30 एप्रिलला मतदान आहे. मतदान झाल्यानंतर लगेच निकाल जाहीर करण्यात येणार आहे
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ग्रामपंचायत सदस्य, शेती सेवा संस्था, आडते व्यापारी व माथाडी कामगार यांचे मतदान ग्राह्य मानले जाते. त्यानुसार येथील बाजर समितीची निवडणूक चार महिन्यांपूर्वीच जाहीर झाली होती. तेव्हाच्या मतदारयादीत ग्रामपंचायतीच्या जुन्या सदस्यांनी नावे मतदार म्हणून समाविष्ठ होती. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे नव्याने सदस्य झालेल्यांची नावे यादीत असावीत, यासाठी न्यायालयात याचिका दाखल झाल्या.
त्यानंतर जाहीर निवडणूक रद्द करून नव्याने ग्रामपंचायत सदस्यांची नावे संकलित करून सुधारित यादी निवडणूक प्राधिकरणास द्यावी, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले. त्यानुसार गेल्या महिन्यात सुधारित मतदारांची यादी बाजार समितीने आयोगास दिली. यानंतर जिल्हा निवडणूक विभागाने निवडणूक कार्यक्रम पुन्हा जाहीर केला आहे.
दि.27 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होईल.
3 एप्रिल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. जामखेड बाजार समितीचे 18 संचालकाचे कार्यकारी मंडळ आहे. तालुक्यात एकण 48 विविध कार्यकारी सेवा संस्था असून, सेवा संस्था मतदारसंघात एकूण 615 मतदार आहेत. तर, तालुक्यात 58 ग्रामपंचायती असून, या मतदारसंघात 509 मतदारांचा समावेश आहे. तर व्यापारी/आडते मतदारसंघात 333 मतदार असून, हमाल/ मापाडी मतदारसंघात 241 मतदार आहेत. सेवा संस्था मतदारसंघातून 11, ग्रामपंचायत मतदारसंघातून 4, व्यापारी मतदारसंघातून 2, तर हमाल/ मापाडी मतदारसंघातून 1 संचालक निवडून येतो. गेल्या दोन वर्षांपासून या बाजार समितीवर प्रशासक राज आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत व सेवा संस्थांच्या निवडणुकांमधून निवडून आलेले सदस्य निवडणुकीसाठी पात्र मतदार आहेत.
निवडणूक कार्यक्रम असा :
अर्ज दाखल करणे ः 27 एप्रिल ते 3 मार्च, अर्ज छाननी ः 5 एप्रिल, वैध अर्ज प्रसिद्धी ः 6 एप्रिल, अर्ज माघाराची मुदत ः 6 एप्रिल ते 20 एप्रिल, चिन्ह वाटप ः 21 एप्रिल, मतदान ः 30 एप्रिल, निकाल ः मतदान झाल्यावर लगेच
आमदारद्वयींत सत्तेसाठी रस्सीखेच
स्थानिक राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारी आणि शेतकऱ्यांशी थेट जोडलेली संस्था म्हणजेच बाजार समिती. या समित्या ताब्यात म्हणजे जिल्हा परिषदेसह निवडणुकीसाठीचे महत्त्वाचे प्रवेशद्वारच आहे. यंदाही राजकीय पक्षांचा बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी कस लागणार आहे. जामखेड बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली तयारी सुरू आहे. दुसरीकडे आमदार राम शिंदे यांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे.