मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात विधानसभा निवडणुकीत भाजपा २४० जागांवर तर शिंदे गट उरलेल्या ४८ जागांवर लढेल असे म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आता राज्यातील राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असता दिसत आहेत. त्यातच “महाराष्ट्रातल्या निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे. हे वर्ष संपेस्तोवर महाराष्ट्रात शिंदे गटाचं नामोनिशाणही उरणार नाही. विधानसभा निवडणूक जेव्हा लागेल तेव्हा सर्व २८८ जागांवर भाजपा निवडणूक लढवेल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
शिंदे गट विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकेल असं वाटत नाही. स्थानिक पक्षांना संपवण्याचं काम भाजपाकडून सातत्याने होतं आहे. मित्र असो किंवा शत्रू असो त्यांना फोडणं, त्यांना नामोहरम करणं हाच भाजपाचा एक कलमी कार्यक्रम असतो असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांचा गट शेवटपर्यंत राहणार का? हा प्रश्न लोकांच्या मनात आहेच. यदाकदाचित हा गट राहिलाच तरीही निवडणूक जवळ आली की भाजपाकडून सर्व्हे केला जातो. त्यानंतर ते शिंदे गटाला सांगितलं जाईल की तुम्ही पाच किंवा सात जागांवर लढा. त्यांच्याकडे ऐकण्यावाचून पर्याय राहणार नाही असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात विधानसभा निवडणुकीत भाजपा २४० जागांवर तर शिंदे गट उरलेल्या ४८ जागांवर लढेल असे म्हटले होते. मात्र हा फॉर्म्युला ठरलेला नाही अशी सारवासारव नंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देत असताना जयंत पाटील यांनी वर्ष संपेपर्यंत शिंदे गटाचं नामोनिशाण उरणार नाही आणि उरलंच तर त्यांना पाच-सात जागांवर समाधान मानावे लागेल असे म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांना सांगितलं जाईल की तुमच्या पाच-सहा जागा निवडून येऊ शकतात त्यामुळे आम्ही दुसरा पर्याय देतो. निवडणुकीला एक वर्ष उरलेलं असताना ४८ जागांवर शिंदे गट आला आहे. निवडणूक जाहीर होईपर्यंत शिंदे गटाला पाच-सात जागा मिळाल्या तरीही आश्चर्य वाटणार नाही असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.