मुंबई : राज्यातील कांद्याच्या दरामुळे शेतकऱ्यांचे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या कांद्याच्या समस्येचे विधानभवनात देखील याचे पडसाद उमटले आहेत. आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादीच्या आमदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून पायऱ्यांवर उतरत जोरदार आंदोलन केले. कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांसह आता आमदार कांदा प्रश्नी आक्रमक झाल्याचे आजच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पाहायला मिळाले.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून गेल्या काही दिवसांपासून कांदा प्रश्न पेटला आहे. अनेक भागात शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. कांदा भावात सततची घसरण होत असल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. अशातच हा मुद्दा आता विधानभवनात देखील गाजत असून राष्ट्रवादी निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्यासह इतर आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्या उतरत जोरदार आंदोलन केले.
यावेळी “सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरी द्रोही सरकारचा निषेध असो… कांद्याला भाव मिळालाच पाहिजे… कापसाला भाव मिळालाच पाहिजे,” अशा घोषणांनी राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. राज्यातील कांदा उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळत नसल्याने अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी कांदा आणि कापसाच्या माळा घालून राष्ट्रवादी आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला हमीभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागात कांदा लिलाव बंद पडल्याचे दिसून आले. विधीमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांकडून कांद्या संदर्भात आंदोलन करण्यात आले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात विरोधक आक्रमक झालेले आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी डोक्यावरती कांद्याच्या टोपल्या घेऊन विरोधकांनी आंदोलन केले आहे. कांद्याची टोपली घेऊन विधान भवनाच्या परिसरात पोहोचले. मात्र त्यावेळी सुरक्षारक्षकांनी अडवले. मात्र सत्ताधाऱ्यांचे हे लक्षात आणण्यासाठी विधानभवनात प्रवेश करणार असून कांद्याला जोपर्यंत योग्य भाव मिळत नाही, शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यत आंदोलन सुरू राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.