अहमदाबाद – भारत व न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना आज येथे होत आहे. या मालिकेतील प्रत्येकी एक सामना दोन्ही संघांनी जिंकला असल्यामुळे आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता ठरणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड
वेळ : संध्याकाळी 7 पासून
ठीकाण :अहमदाबाद
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस
यापूर्वी या दोन संघात झालेली तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारतीय संघाने 3-0 अशी निर्विवाद जिंकली होती, त्यामुळे आता टी-20 मालिकाही 2-1 अशी जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. या मालिकेतील पहिल्या लढतीत न्यूझीलंडने भारताचा 21 धावांनी पराभव केला होता तर दुसरी लढत भारताने 6 गडी राखून जिंकली होती. मात्र, ही लढत ज्या मैदानावर झाली त्या लखनौच्या मैदानाची खेळपट्टी आता वादात अडकली आहे. त्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला अवघ्या 99 धावांवर रोखले होते तरीही धावांची शंभरी गाठताना भारतीय संघाची दमछाक झाली होती.
या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी विजयासाठी आवश्यक 100 धावांचा पाठलाग करताना चार फलंदाज गमावले होते. त्यामुळे इशान किशन, शुभमन गिलसह सर्वच फलंदाजांच्या बेजबाबदार वृत्तीवर सडकून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर तिसरा सामना भारतीय संघ कोणत्या दृष्टीकोनाने खेळतो याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असल्याचे सांगितले जात असले तरीही सामना दिवसरात्र होत असल्याने संध्याकाळी दव हा खूप मोठा मुद्दा ठरणार आहे. या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्या तोच संघ खेळवणार की पृथ्वी शॉ, मुकेश कुमार, उमरान मलिक व जीतेश शर्मा या बेंचवरील सर्व खेळाडूंना संधी देणार का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हा सामना मालिकेचा निर्णय स्पष्ट करणारा ठरणार असल्याने सेफ गेम म्हणून पंड्या आहे तोच संघ कायम ठेवण्याचीच शक्यता जास्त आहे.
दुसरीकडे न्यूझीलंडसाठी यंदा हा बारत दौराही फार यशस्वी ठरला नाही. त्यांना एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत व्हाइटवॉश स्वीकारावा लागला असून हा सामना गमावला तर टी-20 मालिकाही त्यांच्या हातातून जाणार आहे. नवा कर्णधार मिचेल सॅंटनर संघात काय बदल करणार का हे त्यांच्यासाठीही महत्वाचे ठरणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या रक्कमेत वाढ, आता 10 लाखांऐवजी….
त्रिपाठीच्या जागी शॉ याला खेळवणार का ?
महाराष्ट्राचा युवा फलंदाज राहुल त्रिपाठी याला संघात स्थान दिल्यावरही पारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. मात्र, देशांतर्गत स्पर्धांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केलेल्या मुंबईकर पृथ्वी शॉ याला त्रिपाठीच्या जागी संधी मिळेल का हे उत्सूकतेचे ठरले आहे. शॉ हा सलामीवीर असल्याने पंड्या इशान किशन व शुभमन गिल यांच्यापैकी एकाला मधल्या फळीत खेळवेल असेही संकेत मिळत आहेत. त्यातही इशानला मधल्या पळीत खेळण्याचा अनुभव असल्याने गिलसह शॉ ङारताच्या डावाची सुरुवात करेल असेच चित्र सध्या दिसत आहे.