कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बहुचर्चित “भारत जोडो’ यात्रेचा काल श्रीनगरातील सभेने समारोप झाला. सुमारे दीडशे दिवसांच्या या यात्रेमुळे राहुल गांधी यांची प्रतिमा विलक्षण उजळली आहे, त्यांच्यात अनेकांना आशेचा किरण दिसू लागला आहे. ते आता गंभीर राजकारणी बनले आहेत, त्यांची भाजपने तयार केलेली प्रतिमा पुसली गेली आहे, असे अनेक निष्कर्ष जाणकार विश्लेषकांनी काढले आहेत. त्यात बरेच तथ्यही आहे. यात्रेच्या इतक्या यशाची बहुधा कॉंग्रेसजनांनाही अपेक्षा नसावी.
देशातील मोठ्या जनसमूहाशी त्यांचे यानिमित्ताने थेट कनेक्शन झाले. त्यातून राहुल गांधी हे नेमके काय रसायन आहे त्याविषयीही लोकांना थेट जाणून घेता आले. राहुल गांधी यांनीही या यात्रेच्या दरम्यान विविध ठिकाणी जाहीर सभा घेऊन तसेच नियमितपणे खुल्या वातावरणातील पत्रकार परिषदा घेऊन दिलखुलासपणे आपली मते मांडली. त्यातून त्यांच्यातील प्रगल्भता दिवसेंदिवस वाढतच गेलेली दिसून आली. आपण ही यात्रा कशासाठी काढली आहे यावर ते सातत्याने भाष्य करीत राहिले. सरकारकडून सुरू असलेल्या मुस्कटदाबीला त्यांनी यानिमित्ताने नेमकेपणाने वाचा फोडली. आम्हाला प्रसार माध्यमांमध्ये स्थान मिळत नाही आणि संसदेतही आम्हाला बोलू दिले जात नाही, लोकांचे प्रश्न मांडत असताना आमचा संसदेतील माइकही बंद केला जातो त्यामुळे आता थेट जनतेत मिसळूनच गंभीर विषयांना वाचा फोडली पाहिजे, या हेतूने आम्ही ही यात्रा सुरू केल्याचे त्यांनी यात्रेच्या दरम्यान वेळोवेळी नमूद केले आहे.
देशातील जनतेला त्यांनी “डरो मत’ हा संदेशही ठिकठिकाणी दिला. त्यामुळे दबावाच्या वातावरणात जनतेच्या मनातही निर्भयतेचे वातावरण निर्माण करण्यात ते बऱ्याच अंशी यशस्वी झाले आहेत, असे म्हणावे लागेल. त्यांची ही यात्रा राजकीय स्वरूपाची नव्हती. त्यामुळे ही केवळ कॉंग्रेसच्या प्रचाराची यात्रा नाही, असे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केल्याने समाजातील वेगवेगळ्या विचारसरणीच्या संघटना आणि बिगर कॉंग्रेसी नेतेही उत्स्फूर्तपणे या यात्रेत सहभागी झाले होते. या यात्रेमुळे स्वत:मध्येही मोठा बदल झाला असल्याचे नमूद करताना त्यांनी, “मैने पुराने राहुल गांधी को मार दिया है’ असे वेगळेच ओजस्वी उद्गार या यात्रेच्यावेळी काढले आहेत. त्यामुळे काही जण अवाक् झालेले पहायला मिळाले. या यात्रेमुळे राहुल गांधी यांच्या वाट्याला अफाट स्तुती आणि कौतुक आले. कोणी त्यांना रामाची कोणी गांधींची तर कोणी आदी शंकराचार्यांची उपमा दिली. या उपमा किती सार्थ होत्या हे आगामी काळच सांगू शकेल, पण एक मात्र निश्चित की आता जर आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करायचा तर राहुल गांधी हा फॅक्टर भाजपलाही दुर्लक्षित करता येणार नाही, इतके महत्त्व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला लाभले आहे.
“नॉन सिरियस पॉलिटीशीयन’ अशी त्यांची प्रतिमा बनली होती, ती आता पुसली गेली आहे, हे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे फलित आहे. यातून जे विधायक वातावरण त्यांच्यासाठी निर्माण झाले आहे, त्याचा त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत राजकीय लाभ होऊ शकतो, हे जरी खरे असले तरी आता प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलला कॉंग्रेसचे अस्तित्व दिवसेंदिवस क्षीण होत चालले आहे त्यावर काय उपाययोजना केली जाणार आहे हे पाहणे आवश्यक बनले आहे. प्रादेशिक पक्षांची मदत घेऊनच त्यांना या लोकसभा निवडणुकीत मोदींशी व भाजपशी दोन हात करावे लागणार आहेत. विरोधकांचे एकत्रीकरण करणे आणि त्यांना कॉंग्रेसचे नेतृत्व मान्य करायला लावणे हे त्यांच्यापुढचे एक मोठे आव्हान असणार आहे. राहुल गांधी यांनी समारोपाच्या सभेला 21 राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण पाठवले होते. तथापि, अनेक महत्त्वाच्या पक्षांनी सुरक्षेचे कारण पुढे करून त्यांचे हे निमंत्रण अव्हेरले आहे. त्यामुळे विरोधकांमधील मतविभागणीचा धोका ते कसे टाळणार याला फार महत्त्व आहे.
मोदी आणि भाजपला गेल्या दोन निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले असले, तरी त्यांना पडलेल्या मतांची टक्केवारी दोन्ही वेळा 40 टक्क्यांपेक्षा अधिक नव्हती. याचाच दुसरा अर्थ असा की, मोदी लाटेतही मोदींच्या विरोधात पडलेल्या मतांची एकत्रित बेरीज त्यापेक्षा कितीतरी अधिक म्हणजे 60 टक्के इतकी होती. अलीकडेच सी वोटर आणि इंडिया टुडेनेही जो नवीन सर्व्हे केला आहे त्यातही भाजपला 40 टक्केच मते पडतील, असे अनुमान काढण्यात आले आहे. म्हणजेच आगामी निवडणुकीतही मोदींच्या विरोधात 60 टक्के मते पडणार; पण ती विरोधकांतील बेकीमुळे विभागली जाणार असल्याने त्याचा नैसर्गिक लाभ मोदी व भाजपलाच होणार हे अगदी स्पष्ट आहे. अशा वातावरणात राहुल गांधी यांचे नेतृत्व विरोधकांचे ऐक्य साधण्यात कितपत यशस्वी होईल, त्याला मोठे राजकीय महत्त्व आहे.
तेलंगणातील बीआरएस पक्ष, आम आदमी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष वगैरे पक्षांनी आधीपासूनच स्वतंत्र आघाडी स्थापन केली आहे. तृणमूल कॉंग्रेस पक्ष, समाजवादी पक्ष असे मोठे प्रादेशिक पक्षही अजून स्वतःची वेगळीच चूल मांडण्याच्या मूडमध्ये आहेत. अशा स्थितीत राहुल यांच्या राजकीय कौशल्याची कसोटी लागणार आहे. भारत जोडो यात्रेमुळे त्यांची वैयक्तिक प्रतिमा सुधारली असली तरी त्यांच्यातील राजकीय कौशल्य किती वाढले आहे हे मात्र अजून सिद्ध व्हायचे आहे. आता त्यांना त्यासाठी तयारी करावी लागणार आहे. भारत जोडो यात्रेने कॉंग्रेससाठी विधायक वातावरण निर्माण झाले असले, तरी अजून लोकसभा निवडणुका सव्वा वर्ष लांब आहेत, त्या अवधीत हे विधायक वातावरण टिकवून ठेवण्याचा संघर्ष राहुल गांधी यांना करावा लागणार आहे.
बहुधा याच उद्देशाने कॉंग्रेस पक्षाने आता पक्षीय बांधणीच्या हेतूने “हाथ से हाथ जोडो’ ही मोहीम हाती घेतली आहे. अशाच स्वरूपाच्या कल्पक योजना राबवून त्यांना आपल्या पक्षाच्या शिडात हवा भरावी लागणार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा हा राजकीय संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे, असे म्हणावे लागेल. या निर्णायक टप्प्यात निर्णायक राजकीय यश पदरात पाडून घेणे यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा खरा कस लागणार आहे.