पिंपरी -राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होणार असून या विस्तारामध्ये महिलांना निश्चितपणे स्थान दिले जाईल, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून व शिवांजली सखी महिला मंच आयोजित भोसरीतील इंद्रायणी थडीचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि. 25) करण्यात आले. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार राहुल कुल, आमदार उमा खापरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, अमर साबळे, माजी आमदार बाळा भेगडे, जगदीश मुळीक, शरद सोनवणे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, शंकर जगताप, कालीचरण महाराज, माजी महापौर माई ढोरे, लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिलाध्यक्षा कविता आल्हाट, शिवांजली सखी मंचच्या पूजा लांडगे, भाजपच्या कांचन कुल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर फडणवीस यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केले. नाशिकमधील सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन सुरू असलेल्या अनेक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांना विचारले असता ते म्हणाले, सत्याजीत तांबे हे निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरले आहेत. त्यांना कॉंग्रेसने निलंबित केले आहे. त्यामुळे त्याठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे, हे माझ्यापेक्षा त्यांनाच विचारलेलं बरं, असे, सांगत अधिक राजकीय भाष्य करण्याचे टाळले. राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार, विकासकामे, चिंचवड व कसबा विधानसभेची पोटनिवडणूक यासह विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले. मंत्रीमंडळ विस्तारामध्ये महिलांना स्थान देणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी अखेरच्या श्वासापर्यंत पक्षकार्य निष्ठेने करणारे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक, दिगंबर भेगडे, बाबुराव पाचर्णे यांच्या कुटुंबातील सदस्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.