मुंबई : उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्याविषयी मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होत्या. याच सर्व चर्चांना उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी पूर्णविराम दिला आहे. कारण उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची आज घोषणा करण्यात आली आहे. दोघांनी मिळून आज संयुक्त पत्रकार परिषद घेत या युतीची माहिती दिली.
आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्याच्या राजकारणातील नव्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, या नव्या युतीविषयी बोलताना “वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही एकत्र येण्याचे ठरवले आहे. पुढे राजकीय वाटचाल कशी असेल. आणखी पुढे काय करता येईल या सर्व गोष्टींचा त्या-त्या वेळेला जशी वेळ येईल तसा विचार केला जाईल. असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी, “आज जे काही देशात चालू आहे ते तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. काल-परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन गेले. निवडणुका आल्यानंतर गरिबांचा उदोउदो करायचा. गरिबांनी मतदान केल्यानंतर ते रस्त्यावर येतात. तर दुसरीकडे यांची उड्डाणं चालू होतात. हे सगळं थांबवण्याची गरज आहे. म्हणूनच आम्ही एकत्र आलो आहोत,” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, युतीची घोषणा करताना “जनतेला नको त्या वादात अडकवून भ्रमात ठेऊनच हुकुमशाही येते. त्याच वैचारिक प्रदुषणातून देशाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी, देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आणि घटनेचं पावित्र्य जपण्यासाठी आम्ही दोघे एकत्र येत आहोत,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच ठाकरे यांनी भाजपा, शिंदे गट तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.