मुंबई : लेकीचं लग्न म्हणजे बापाच्या आयुष्यातील एक आनंदाचा तितकाच भावुक करणारा क्षण असतो. तो क्षण तर प्रत्येक बापासाठी कमालीचा वेदनादायी असतो. त्यातच मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचाही समावेश आहे. कारण काल मुंबईत सगळीकडे महाविकास आघाडी सरकारच्या महामोर्चाही चर्चा होती, त्यावेळी विवेक फणसाळकर यांच्या घरात सनई चौघडे वाजत होते. मात्र अशा परिस्थितीत फणसाळकर यांनी कर्तव्याला प्राधान्य देत काल दिवसभर मोर्चामध्ये हजर राहिले आणि मोर्चा संपल्यानंतर त्यांनी लेकीच्या डोक्यावर अक्षदा टाकल्या.
प्रत्येक वडिलांची आपल्या लेकीच्या लग्नासाठीचे विचार वेगळे असतात. त्याला विवेक फणसाळकर तरी कसे अपवाद असतील… पण फणसाळकरांच्या लेकीच्या लग्नादिवशीच मविआच्या मोर्चा निघाला अन् फणसाळकरांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. मात्र, त्यांनी पहिल्यांदा कर्तव्य बजावले आणि नंतर मोर्चा संपन्न झाल्यावर त्यांनी लेकीच्या लग्नसोहळ्यात भाग घेऊन वधूवरांना आशीर्वाद देऊन, पै पाहुण्यांची विचारपूस करुन बापाचेही कर्तव्य योग्यरीतीने पार पाडले. त्यांच्या या कृतीमुळे त्यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात मविआने काल विराट मोर्चा काढला. जवळपास साडे पाच किमीचे अंतर पार करण्यासाठी मोर्चेकऱ्यांना सुमारे दोन तास लागले. त्यानंतर नेतेमंडळींची भाषणे झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भाषणाने सभेची सांगता झाली. त्यानंतर सुमारे अडीच हजार पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांची ड्युटी संपली. यामध्ये पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे देखील होते. दरम्यान, त्यांच्या या कृतीमुळे सोशल मीडियावरही त्यांची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.