कामशेत (चेतन वाघमारे) – नाणे मावळात कोणत्याही राष्ट्रीयीकृत अथवा सहकारी बॅंकेची शाखा नसल्याने नाणे मावळवासीयांना कामासाठी थेट कामशेत गाठावे लागत आहे. बॅंकेशी संबंधित सर्वव्यवहार करण्यासाठी कामशेतशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे नाणे मावळातील नागरिकांची आजही मोठी पायपीट होत आहे. त्यामुळे वेळ व पैशाचा मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
सुमारे पंचवीस ते तीस गावांचा मिळून नाणे मावळ हा भाग बनला आहे. त्यामध्ये नाणे, कांब्रे ना. मा., कोंडिवडे ना.मा., करंजगाव, थोरण,चिखलसे, लागते. जांभवली, पाले ना. मा. साई, वाउंड, नाणोली, उंबरवाडी, मोरमारवाडी आदी गावे नाणे मावळमध्ये येतात. या गावामध्ये एकही राष्ट्रीयकृत, सहकारी वा जिल्हा बॅंकेची आजही शाखा नाही. त्यामुळे नाणे मावळवासीयांना थेट वीस ते पंचवीस किलोमीटरवरून कामशेत गाठावे लागते. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. नाणे मावळमधील छोटया व्यापारी वर्गाला बॅंकेशी संबंधित कोणत्याही व्यवहारासाठी कामशेतला जावे लागत आहे.
नाणे मावळातील शेतकरी व व्यापाऱ्यांकडे असलेल्या रोख रकमेचा भरणा करणे, शासकीय योजनांची माहिती घेणे, बॅंक खात्यामधून रक्कम काढणे , बॅंकेतील योजनांचा लाभ घेण्यासाठी, बालवाडी शिक्षकांचे पगार, शाळांचे जमा होणारे अनुदान, तसेच महिला बचत गटातील महिलांना कर्ज व पैसे जमा करण्यासाठी थेट बॅंकेच्या शाखेत यावे लागते. संजय गांधी निराधार योजना व शासकीय वयोवृद्ध पेन्शनधारकांना नाईलाजाने कामशेतपर्यंतचा प्रवास कारावा लागत आहे. पावसाळ्यात तर या भागात असलेल्या मुसळधार पावसामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प होत असतात. त्यामुळे पावसाळ्यात तर या भागातील नागरिकांचा कामशेतशी असलेला संपर्क तुटत असतो. त्यामुळे या कालावधीत बॅंकांमध्ये येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
कामशेतला येण्यासाठी आठवडे बाजाराला प्राधान्य
सुरक्षेच्या कारणास्तव या गावांमधील व्यावसायिकांना अथवा नागरिकांना मोठी रोख रक्कम स्वत:कडे ठेवता येत नाही. त्यामुळे मोठी रक्कम काढतादेखील येत नाही. परिणामी आवश्यक असलेल्या रकमेसाठी कार्यालयीन कामकाजाची वेळ पाळत बॅंकांच्या शाखेत जावे लागत आहे. त्यामुळे बहुतांशी नागरिकांकडून कामशेतचा आठवडा बाजार असलेल्या मंगळवारी बॅंकांमध्ये येऊन रक्कम काढून, बाजारहाट करण्यावर नागरिकांचा भर असतो.
एकही “एटीम’ नसल्याने गैरसोयीत आणखी भर
आंदर मावळ, पवन मावळ परिसरात राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या शाखा आहेत. परंतु नाणे मावळ भागात बॅंक नसल्याने येथील नागरिकांना बॅंक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यातच बॅंक एटीएमदेखील नसल्याने अडचणीच्या काळात रात्री अपरात्री कामशेतला येण्याचा पर्याय या गावांमधील नागरिकांना स्विकारावा लागत आहे.
=