मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांनी पुणे शहरात (दि.13) दुपारी तीनपर्यंत ‘पुणे बंद’ची हाक दिली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली आहेत. या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी पुणे बंदची हाक दिली होती. यामध्ये शहरातील विविध संघटना आणि मान्यवर व्यक्ती यांनी पाठिंबा देत मोर्चामध्येही सहभागी झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, पुण्यानंतर आता वरळीत बंद पुकारला जात आहे. मुंबईतील हा पहिलाच बंद आहे. पहाटे 6 वाजल्यापासूनच वरळीत बंद पुकारण्यात आला आहे. सकाळपासूनच वरळीतील दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनीही या बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे. तसेच रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरू असल्याने रस्ते ओस पडलेले दिसत आहेत.
माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी हा मतदारसंघ असल्याने या बंदला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विविध संघटना आणि छोट्या पक्षांनी मिळून ही बंदची हाक दिली असून, यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये वा बंदला हिंसक वळण लागू नये म्हणून संपूर्ण वरळीत परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोश्यारींचं विधान काय होत…!
एका कार्यक्रमात कोश्यारी म्हणाले होते.., ‘तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील’, असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होत.