येरवडा -गोल्फ चौकात उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. डिसेंबर अखेर उड्डाणपुलाचे काम पूर्ण करायचे असल्याने रात्रंदिवस सुरू असलेल्या कामात कामगारांचे जीव मात्र धोक्यात घातले जात आहेत. उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने कामगारांना सुरक्षेची कोणतीच साधने पुरविलेली नसल्याने जीव धोक्यात टाकून हे कामगार काम करीत आहेत.
गोल्फ चौकातील या उड्डाणपुलाबाबत अनेक तक्रारी असूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करायचे असल्याने निकृष्ठ दर्जाचे काम केले जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करीत आहेत. त्यातच या उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची कोणत्याच उपाययोजना केली नसल्याचे दिसते. पुलाच्या कठड्याचे काम करणाऱ्या कामगारांना हेल्मेट नाही, की खाली पडू नये यासाठी कोणती जाळी, दोरीही बांधलेली नाही. रात्रीच्या वेळी मोबाइल टॉर्चमध्ये हे कामगार काम करीत आहेत.
येरवड्यातच रात्रीच्यावेळी लोखंडी जाळीचा स्लॅब कोसळून 11 परप्रांतीय मजूर मरण पावले होते. मात्र, असे असूनही कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीच काळजी घेतलेली नाही, त्यामुळे पालिकेचे अधिकारी कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी यांना या कामगारांबद्दल अनास्था दिसून येत आहे. ठेकेदाराला काम दिले असल्याने काम करायची जबाबदारी त्याची, त्याने काय करायचे ते करावे, आम्ही फक्त बिलावर सह्या करणार, अशाच पद्धतीचे काम पालिकेत सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या उड्डाणपुलाच्या कामामुळे या रस्त्यावर अनेक छोटे-मोठे अपघात घडत असून लवकरात लवकर काम करण्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम होत असून रात्रीच्यावेळी काम करताना या कामगारांबरोबरच रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचीही सुरक्षितता धोक्यात येत आहे, याची जबाबदारी पालिकेच्या अधिकाऱ्यांची असल्याने त्यांनी योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष रुपेश गायकवाड यांनी सांगितले.