वारजे – देखभाल दुरुस्तीसाठी गुरुवारी “पाणीपुरवठा बंद’ असा महापालिकेकडून फतवा निघतो आणि नागरिक एक दिवसाचा पाणीसाठा करून ठेवतात. मात्र, अनेकवेळी दुसऱ्या दिवशीही पाणी कमी दाबाने, वेळीअवेळी येते. तर चढ असलेल्या भागात पाणी येत नाही. बेजबाबदार आणि नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना पाण्यासाठी पुढील दोन ते तीन दिवस त्रास सहन करावा लागतो. कर्वेनगर, होम कॉलनी परिसरातील नागरिकांना यावेळीही पाण्यासाठी वाट पहावी लागली.
वारजे जलशुद्धीकरण केंद्र, वारजे माळवाडी, कर्वे नगर या भागातील पाणीपुरवठा गुरुवारी (दि. 1) देखभाल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, दुसऱ्या दिवशीही पाणी पुरवठा विस्कळीत झाला. यामध्ये एल ऍन्ड टी कंपनी आणि पाणीपुरवठा विभाग यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. हिंगणे होमकॉलनी कॉलनी परिसरात आठ तास पाणी सोडूनही पुरेशा दाबाने पाणी नसल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी पोहोचले नाही. त्यावर चढ असल्यामुळे पाणी पोहोचले नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या भागात एअर वॉल्व्ह बसवणे आणि सर्व ठिकाणी पाणी कसे पोहोचेल, याबाबत नियोजन करणे गरजेचे आहे, अशी मागणी माजी नगरसेविका वृषाली दत्तात्रय चौधरी यांनी केली.
पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी विभागांमध्ये समन्वय असावा. जबाबदारी, नियोजन आणि कामाचे वेळापत्रक याचे तंतोतंत पालन व्हावे. नागरिकांचे हाल कमी व्हावेत यासाठी नवीन पाण्याची टाकी बांधणे, पर्यायी पाइपलाइन आणि पंप बसवणे गरजेचे आहे.
– वृषाली दत्तात्रय चौधरी, माजी नगरसेविका