मुंबई – प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीभोवती असलेले अनधिकृत बांधकाम हटवण्यास आज पहाटे पासून सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आला. तसेच प्रतापगडाच्या पायथ्याला कलम १४४ लागू करून कोणालाही त्या ठिकाणी जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. यावरुन आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहे.
अशातच हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी वृत्त वाहिनीशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,’राज्यातील स्वराज्याचे शत्रू असलेल्या औरंगजेब आणि अफजलखानाच्या कबरी नेस्तनाबूत करून टाकाव्यात.’ अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. राज्य सरकारने या कबरी उद्ध्वस्त केल्या नाही, तर हे काम हिंदू महासंघ करेन, असे आनंद दवे म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले,’मागील अनेक दिवसांपासून आम्ही अफजलखानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण काढले गेले पाहिजे, अशी मागणी करत होतो. अफजलखानासारख्या राक्षाला दैवत्व देण्याचे काम काही समाजकंटक करत होते. ही कबर काढण्याचे पुण्याचे काम राज्य सरकार करत आहे. औरंगजेब, अफजलखान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला. हिंदुंना त्रास दिला. हिंदुंची मंदिरं तोडली. त्यामुळे त्यांच्या कबरी राज्यात कशाला हव्यात?’ असेही ते म्हणाले आहे.