मुंबई – काँग्रेसने सुरु केलेली ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात येऊन पोहचली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरु असलेल्या या यात्रेला सर्वसामान्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नांदेडमधून सुरुवात करून ही यात्रा उर्वरित महाराष्ट्रात जाणार आहे. यादरम्यान राहुल गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निष्ठा म्हणजे काय हे समजावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड निर्मितीचे कार्य करणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांचा दाखला दिल्याने सर्वजण अवाक झाले.
नांदेड येथील यात्रेदरम्यान राहुल गांधींनी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील प्रकल्प हलवण्यावरून देखील भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी येथील तरुणांचा रोजगार तसेच त्यांचं भविष्यच हिरवताहेत अशी टीका केली.एका दिवसातील यात्रेचं अंतर पूर्ण झाल्यानंतर राहुल गांधी रात्रीच्या जेवणानंतर कार्यकर्त्यांसोबत होणाऱ्या संवादामध्ये देखील सहभागी होत असल्याचे पाहायला मिळालं. यावेळी राहुल गांधींनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला दिल्याने सर्व कार्यकर्त्यांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी रायगडाचे बांधकाम पूर्ण करणाऱ्या हिरोजी यांनी महाराजांकडे फक्त एका पायरीवर नाव लिहिण्याची परवानगी मागितली होती. राहुल गांधींनी हाच संदर्भ देत यावेळी कार्यकर्त्यांना राजनिष्ठेचे उत्तम उदाहरण म्हणजे काय असते ते समजावण्याचा प्रयत्न केला.यापूर्वीही राहुल गांधींनी लिंगायत समाजाद्वारे कपाळावर लावण्यात येणाऱ्या विभूतींचे महत्व सांगितले होते.