सिंहगडरस्ता, दि. 6 (जयंत जाधव) -दरमहा सरासरी 300 युनिट वीज वापर असलेल्या एका ग्राहकाला तब्बल 11 लाखांचे वीजबिल आकारले. अन्य एका प्रकरणात दोन खोल्यांचे घर असलेल्या ग्राहकाला तब्बल 25 हजार रुपयांचे बिल माथी मारण्यात आले आहे. शिवाय, नवीन मीटरचे पैसे भरले असतानाही डिस्प्ले नसलेला जुना मीटर बसवण्यात आला आहे. महावितरणच्या या अजब कारभाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. तर, या विरोधात दाद मागणाऱ्या ग्राहकांना अक्षरश: पिटाळून लावले जात असल्याचे प्रकार “उजेडात’ येत आहेत. त्यामुळे या कारभारावर कोणी करणार का? असा हतबल प्रश्न ग्राहक विचारत आहेत.
अधिकारी प्रतिसाद देईनात
राज्यातील वीजचोरी आणि अन्य प्रकरणांबाबत माहिती विचारण्यासाठी संबंधित प्रतिनिधीने महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. पण, त्यांनी “नंतर फोन करतो’ असे सांगितले. तसेच मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्या पत्नीने फोन उचलला आणि सांगितले “सर ड्रायव्हिंग करत आहेत. ते नंतर फोन करतील.’ त्यानंतर काही वेळाने तालेवार यांना पुन्हा फोन केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
हे वसुलीचे प्रकार थांबवा : योगेंद्र सांगळे
“ग्राहकांना वाढीव बिल आकारून दाद न देणे. त्यांचे मीटर काढून नेणे. अशा प्रकारांविरोधात आम्ही पाठपुरावा करत आहोत. पत्रव्यवहार सुरू आहे. एकीकडे वीजगळती, चोरी होते आहे. पण, प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्या ग्राहकांची पिळवणूकही होते आहे. महावितरण ही शासकीय कंपनी आहे. त्यांनी अन्य खासगी कंपनीपेक्षा वीज विकणे बंधनकारक असूनही ते त्याच्या उलट वाढीव दराने विजेचे विक्री करत आहेत. याचे कारण म्हणजे विजेची चोरी आणि गळती हे आहे. या प्रकारांना जबाबदार असलेल्या अभियंते, व्यवस्थापकीय संचालक, संचालक यांच्याविरुद्ध ऊर्जा विभागाकडे तक्रार करूनही कारवाई झालेली नाही. यानंतर थेट शासनाकडे तक्रार केल्यानंतर दोन मोठ्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे,’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य आरटीआय ह्युमन राइट्स ऍक्टिविस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेंद्र सांगळे यांनी सांगितले.
प्रकरण क्र. 1
वडगाव खुर्द परिसरात दशभुजा मारुती मंदिरामागे एक वीज ग्राहक वास्तव्यास आहेत. त्यांचा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल-2022 या चार महिन्यांचा वीज वापर दरमहा सरासरी 300 युनिट होता. मात्र, मे-2022 मध्ये त्यांना तब्बल 25 हजार युनिट वीज वापरल्याचे सांगत तब्बल 1 लाख 82 हजार 921 रुपयांचे वीजबिल आकारण्यात आले. त्यानंतर 7 जुलैअखेरीस एकूण थकबाकीसह तब्बल 10 लाख 94 हजार 430 रुपये वीजबिल भरण्याचे सूचित करण्यात आले. या प्रकाराने गांगरून गेलेल्या या ग्राहकाने चौकशी करण्याचा प्रयत्न केला. शिवाय “योग्य बिल आकारल्याशिवाय पैसे भरणार नाही,’ अशी भूमिका घेतली. पण, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या ग्राहकाची वीजजोड कापत मीटरदेखील काढून नेले.
वीज चोरी आणि गळती याची आकडेवारी सुन्न करणारी आहे. महावितरणच्या या निष्काळजीपणाचा फटका सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला बसतो. महावितरणकडे 40 ते 42 एवढे भरारी पथक असून मग ते काय काम करतात? या चोरी आणि गळतीविरुद्ध आम्ही राज्य शासनाकडे तक्रार करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू.
– विजय सागर, ग्राहक पंचायत, पुणे
प्रकरण क्र. 2
धनकवडी परिसरात एका महिलेचा वन आर.के. फ्लॅट आहे. त्यांनी जुलै 2022 मध्ये नवीन मीटर बसवण्यासाठी पैसे भरले होते. पण, कर्मचाऱ्यांनी भलतीच हातचलाखी करत या फ्लॅटसाठी जुना आणि सदोष डिस्प्ले नसलेला मीटर बसवला. इतक्यावरच न थांबता सप्टेंबर-2022 या महिन्यातील वीजबिल वापरापोटी या महिलेला तब्बल 25000 रु. बिल आकारण्यात आले. या अन्यायाविरोधात महिलेकडून पाठपुरावा सुरू असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज जोड कट केला आणि मीटर काढून नेले.
वीज चोरी आणि गळती होते हे मान्य आहे; परंतु त्यावर आमची उपाययोजना युद्ध पातळीवर सुरू असते. दर शनिवारी आमची आढावा बैठक असते आणि वीजचोरी, गळतीला आळा घालण्याचे प्रयत्न सुरू असतात. आमचे भरारी पथक नेमलेले आहेत. त्यामध्ये कसूर होत नाही. ग्राहकांच्या वाढीव वीज बिलाचा जर प्रश्न असेल, तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. त्यांचे समाधान केले जाईल. वीज चोरीची रक्कम वसूल करण्यासाठी ग्राहकांचे वीज बिल देयकामध्ये कोणतीही वाढीव शुल्क घेतले जात नाही. ग्राहकांनी आमच्यावर विश्वास ठेवावा.
– अंकुश नाळे, प्रादेशिक संचालक, महावितरण