पुणे, दि. 6-“आषाढी वारीच्या निमित्ताने वाखरी, पंढरपूर येथे येणाऱ्या दिंड्यांच्या वारकऱ्यांना दर वर्षी 18 संतांच्या नावाने आदर्श वारकरी समर्पित जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे,’ अशी घोषणा विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी वाखरी येथे केली.
विश्व शांती केंद्र (आळंदी) माईर्स एमआयटी व श्रीक्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समितीच्या वतीने दिला जाणार हा पुरस्कार वाखरी येथील पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड अन्नपूर्ण सदन (विठ्ठल मंदिर) येथे दिला जाणार आहे. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील असे मान्यवर व्यक्ती जे नोकरी व्यवसाय आणि उच्चशिक्षित असून वारकरी संप्रदायाचा निरपेक्षपणे प्रचार आणि प्रसार करणारे कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते यांना आदर्श कीर्तनकार, प्रवचनकार गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. समाजात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान नांदावे यासाठी महाराष्ट्रातील संत निवृत्ती, ज्ञानदेव महाराज, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ महाराज, संत नामदेव, जगद्गुरू तुकाराम महाराज, जनाबाई, गोराकुंभार, सावतामाळी, सकुबाई, सेना न्हावी, संत कुर्मदास, संत रोहिदास महाराज, जगमित्र नागा, संत निळोबाराय, संत गजानन महाराज, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार, राष्ट्रसंत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्या नावाने हा पुरस्कार दिला देण्यात येईल.
द्वादशीच्या निमित्ताने पांडुरंगाची महापूजा झाली. त्यानंतर विश्वशांती दिंडीच्या अध्यक्ष उषा कराड यांच्या मार्गदर्शनात विश्वशांती गुरूकुल, वाखरीमध्ये दिंडी काढण्यात आली. विविध संतांचे अभंग गात ही दिंडी मंदिरात पोहचली. त्यानंतर भारतीय परंपरेनुसार व अनादी कालानुसार चालत आलेला तुळशी विवाह डॉ. विश्वनाथ कराड व उषा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी डॉ. कराड यांनी वरील घोषणा केली व तुळशी विवाहाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे नियोजन ह.भ.प. शालीकराम महाराज खंदारे यांनी केले.