मुंबई – काँग्रेसचे जेष्ठ नेते राहुल गांधी हे “भारत जोडो”यात्रेमुळे भारतीय एकतेचे प्रतीक बनले आहे. या भारत पदयात्रेनंतर राहुल गांधी यांचे नेतृत्व एका नवीन अवतारात पहायला मिळेल असा विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केला आहे. दिग्विजयसिंह हे या यात्रेत सुरूवातीपासून सहभागी झाले असून भारत यात्रींबरोबर ते पायी चालत आहेत.
यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने अन्य राज्यातील नेतेही सामील होत आहेत. त्यातच माजी मंत्री तथा काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण सध्या राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या नांदेड जिल्ह्यातील आगमानाच्या जय्यत तयारीत व्यस्त आहेत. काल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या यात्रेचा जिल्ह्यातील प्रवास कसा असेल? कोण कोण नेते यात सहभागी होतील याची माहिती दिली.
यावेळी ते म्हणाले,’भारत जोडो यात्रेला कोणत्याही राजकीय पक्षाचा उपक्रम म्हणून न पाहता यात सगळ्या पक्ष, संघटना, संस्था आणि सर्वसामान्यांनी सहभागी व्हावे, यासाठी `मी पण चालणार`, या घोषवाक्याखाली एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. दररोज २४ किलोमीटरची पदयात्रा या भारत जोडो दरम्यान काढण्यात येणार आहे.
ते पुढे म्हणाले,’राहूल गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून पदयात्रेत सहभागी होण्यासाठी अशोक चव्हाण यांनी चालण्याचा सराव सुरू केला आहे. दरम्यान, सकाळी अशोक चव्हाण नांदेडमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत चालण्याचा सराव करतांना दिसले. माजी मंत्री डी.पी.सावंत, आमदार अमर राजूकर हे देखील चव्हाणांसोबत चालण्याचा सराव करत आहेत.’