पुणे, दि. 1 – गणेशोत्सव व नवरात्रीच नाही, तर वर्षभर समाज शांतपणे झोपावा, याकरिता पोलीस, स्वच्छता कर्मचारी, डॉक्टर्स आणि अग्निशमन दलातील जीवरक्षक काम करीत असतात. केवळ आग विझविणे हेच त्यांचे काम नसून इतरही अनेक संकटांमध्ये ते समाजासाठी कार्यरत असतात. सिमेवर ज्याप्रमाणे सैनिक कार्यरत असतात, त्याचप्रमाणे शहराच्या अंतर्गत सुरक्षेचे महत्वाचे काम अग्निशमन दल करते, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्टतर्फे बाजीराव रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालयाच्या सभागृहात अग्निशमन दल अधिकारी व जीवरक्षकांचा कृतज्ञता गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाटील बोलत होते. कार्यक्रमास महापालिका उपायुक्त माधव जगताप, हेमंत रासने, पराग ठाकूर, महेश सूर्यवंशी, ऋग्वेद निरगुडकर, प्रसाद कुलकर्णी, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, विनायक कदम, नितीन पंडित आदी उपस्थित होते. अग्निशमन दल प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांसह जीवरक्षकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
गणेश मंडळांची ताकद…
गणेश मंडळांकडे समाजाकडून येणारा पैसा मोठ्या प्रमाणात गोळा होतो. त्यामाध्यमातून अनेक ठिकाणी सामाजिक कार्य देखील सुरू असते. मात्र, या पैशाची साठवणूक व बचत न करता, हा सगळा पैसा समाजासाठी खर्च करायला हवा. चांगल्या कार्यासाठी पैसा खर्च झाल्यास समाजाकडून सातत्याने निधी गोळा होत असतो. समाजासाठी खर्च करून पुण्याचे सर्व प्रकारचे दु:ख संपविण्याची ताकद गणेश मंडळांमध्ये असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.