कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी गेहलोत विरुद्ध शशी थरूर, अशी निवडणूक होण्याचे संकेत आहेत. गांधी घराण्यातील सदस्याशिवाय होणाऱ्या या निवडणुकीविषयी…
“राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवली नाही, तर मी अर्ज दाखल करणार आहे. त्यापूर्वी राहुलजींना एकदा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहण्याची मी विनंती करणार आहे’, असे उद्गार राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काढले होते. परंतु त्यांच्या विनंतीचा कोणताही उपयोग झाला नाही आणि राहुल गांधी निवडणूक न लढवण्याच्या आपल्या निर्णावर ठाम राहिले आहेत. कॉंग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे जाऊनही उपयोग झाला नाही. त्यामुळे गेहलोत आता कॉंग्रेस अध्यक्षपद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, हे स्पष्ट आहे.
अध्यक्षपदासाठी 24 सप्टेंबरपासून नाम-निर्देशन अर्ज दाखल सुरू झाले असून, 17 ऑक्टोबर रोजी निवडणूक होईल आणि 19 ऑक्टोबरला निकालाची घोषणा होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून गांधी घराण्यातील कोणीही सहभागी होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. गेहलोत विरुद्ध शशी थरूर, अशी निवडणूक होण्याचे संकेत आहेत. जी-23 गटातील काही नेत्यांची थरूर यांच्या नावाला सहमती नाही. या गटातर्फे मनीष तिवारीदेखील उभे राहू शकतात. थरूर यांनी निवडणुकीसंदर्भात सोनिया गांधींचीसुद्धा भेट घेतली. पक्षाध्यक्षपदासाठी 22 वर्षांनंतर निवडणूक होत आहे. त्यावेळी कॉंग्रेस हा प्रभावी पक्ष होता, परंतु आज केवळ राजस्थान आणि छत्तीसगडमध्येच कॉंग्रेसची सत्ता आहे. आतापर्यंत महाराष्ट्रासह सात ते आठ प्रदेश कॉंग्रेस समित्यांनी राहुल गांधींनी अध्यक्ष बनावे, म्हणून ठराव संमत केले. परंतु यावेळी 1998 नंतर प्रथमच कॉंग्रेसचे पक्षाध्यक्षपद गांधी घराण्याबाहेर जाण्याची शक्यता आहे.
सोनिया गांधी या 1998 मध्ये पक्षाध्यक्ष झाल्या आणि अलीकडे काही वर्षांपूर्वी राहुल गांधीही पक्षाध्यक्ष होते. परंतु 2019च्या पराभवानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. 1978 नंतर अध्यक्षपद गांधी घराण्यातील व्यक्तीकडेच होते. परंतु 1992 ते 98 दरम्यान, पी. व्ही. नरसिंह राव आणि सीताराम केसरी यांच्याकडे हे पद होते. आज कॉंग्रेसला खरी गरज आहे, ती संघटना बांधणाऱ्या उत्तम नेतृत्वाची. गेहलोत यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदापासून ते विविध राज्यांतील प्रभारीपदेही कार्यक्षमपणे सांभाळली आहेत. इंदिरा गांधींच्या काळापासून ते कॉंग्रेस पक्षात सक्रिय असून, ते चलाख आणि व्यवहारचतुरही आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांची कामगिरी यशस्वी असून, अनेक कल्याणकारी योजना त्यांनी राबवल्या आहेत. केंद्रात मंत्री म्हणून काम करतानाही त्यांनी आपली कर्तबगारी दाखवली आहे. शिवाय ते गांधी घराण्याच्या विश्वासातील आहेत. उद्या गेहलोत विजयी झाल्यास, “बघा, अजूनही कॉंग्रेसवर गांधी घराण्याचेच राज्य चालते,’ अशी टीका भाजप करतच राहणार. वास्तविक राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर, प्रकृती ठीक नसतानादेखील पक्षाने केलेल्या आग्रहास्तव सोनिया गांधींनी हंगामी पक्षाध्यक्षपद स्वीकारले. त्यांना मध्यंतरी करोनाही झाला होता आणि त्यांना अन्य दुर्धर आजारही आहेत. सोनिया, राहुल वा प्रियांका यांना पदाची लालसा नाही. कॉंग्रेसच्या विचारांवर त्यांची श्रद्धा असून, पक्षाच्या दीर्घकालीन हितासाठीच हे तिघेही काम करत आहेत. पक्षाध्यक्षपदाचा या मंडळींनी त्याग केला, तरी विरोधक टीकाच करत राहणार यात शंका नाही.
मुळात गेहलोत यांना मुख्यमंत्रिपद सोडायचे नव्हते. पक्षाध्यक्ष झाले, तरी मुख्यमंत्रिपदी राहण्याची त्यांची इच्छा होती. परंतु “एक व्यक्ती दोन पदे’, असे चालणार नाही, अशा शब्दांत तेथील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या सचिन पायलट यांनी गेहलोत यांच्यावर टीकास्त्र सोडले. वास्तविक मागील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला राजस्थानात यश मिळाले, ते प्रदेशाध्यक्ष म्हणून सचिन पायलट यांनी केलेल्या अपार कष्टांमुळे. परंतु गेहलोत यांनाच मुख्यमंत्रिपद मिळाले आणि त्यामुळे पायलट नाराज झाले. काही काळ ते उपमुख्यमंत्री राहिले आणि पुढे त्यांनी ते पद सोडले. त्यानंतर पायलट यांनी भाजपच्या साथीने बंड केले. परतुं ते शमवण्यात कॉंग्रेसला यश आले. विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून, त्यापूर्वी माझ्या हातात राज्यशकट द्या, असा हट्ट पायलट यांनी गेल्या वर्षभर सोनियाजींकडे धरला आहे. परंतु गेहलोत गादी सोडण्यास तयार नव्हते. आता गेहलोत कॉंग्रेसचे अध्यक्ष बनले, तरी पायलट यांच्या नावाला किती आमदार पाठिंबा देतात हे पाहावे लागेल.
विशेष म्हणजे, गेहलोत यांनी विधानसभाध्यक्ष सी. पी. जोशी यांना आपला वारसदार नेमावे, अशी मागणी नेतृत्वाकडे केली आहे. वास्तविक जोशी आणि गेहलोत याचे संबंध पूर्वी बरे नव्हते. परंतु जेव्हा पायलट यांच्या नेतृत्वाखाली बंड झाले, तेव्हा म्हणजे जून 2020 मध्ये जोशीच गेहलोत यांच्या मदतीला धावून गेले होते. ज्यावेळी बंडखोर आमदार मानेसर येथे मुक्कम ठोकून होते, त्यापैकी 19 कॉंग्रेस आमदारांना जोशी यांनी अपात्रतेची नोटीस पाठवली होती आणि त्यात सचिन पायलट यांचाही समावेश होता. मात्र गेहलोत यांचे मुख्यमंत्रिपदाला चिकटून राहण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, राहुल गांधी यांनी आपण कॉंग्रेसच्या “एक व्यक्ती एक पद’, या नियमाशी सहमत आहोत, असे म्हटले होते.
भाजपात लहानातला लहान कार्यकर्ताही उच्च पदावर जाऊ शकतो, हे खरे आहे. कॉंग्रेसमध्ये घराणेशाही होतीच, यातही शंका नाही. परंतु कॉंग्रेस पक्षालादेखील गांधी घराणे हवे होते, हेही नाकारण्याचे कारण नाही. भाजपमध्येही पूर्वी वाजपेयी-अडवाणी यांच्याच मर्जीतला अध्यक्ष व्हायचा आणि आताही मोदी-शहा यांच्याच मर्जीतला अध्यक्ष होतो. नितीन गडकरींना पक्षाध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळणार होती, पण तो निर्णय आयत्या वेळी रद्द झाला. असो. उद्या गेहलोत विरुद्ध थरूर अशी लढत झाल्यास, त्यात थरूर मागे पडतील, असा अनेकांचा अंदाज आहे.
थरूर हे प्रतिभावान लेखक, विचारवंत आणि अर्थशास्त्र व परराष्ट्र संबंधांचे जाणकार असून, संयुक्त राष्ट्रांमध्ये त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. केंद्रीय मंत्री आणि खासदार म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे आणि मध्यमवर्ग व उच्चवर्गात ते लोकप्रिय आहेत. समाजमाध्यामांवर ते सक्रिय असतात आणि अनेकदा पक्षाच्या धोरणास छेद देणारे परखड मतप्रदर्शन करत असतात. परंतु थरूर हे केरळबाहेर फारसे लोकप्रिय नाहीत आणि हिंदीभाषिक पट्ट्यात त्यांना फारसे कोण ओळखत नाही. उत्तर भारतात कॉंग्रेस वाढवल्याशिवाय देशात सत्तेवर येऊ शकणार नाही. त्यामुळे अशोक गेहलोत यांचे पारडे जड आहे, असे दिसते.