तमाम भारतीयांचा सर्वात आवडता आणि लाडका धार्मिक उत्सव असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. बुद्धीची देवता असलेल्या गणेशाच्या उत्सवानंतर येणाऱ्या शक्तीच्या या उत्सवाचे तमाम भाविक मोठ्या उत्सवाने स्वागत करत असतात. आता तर करोनासुरासारख्या आधुनिक असुराच्या तावडीतून जनता मुक्त होत असताना हा उत्सव नेहमीपेक्षा जास्तच उत्साहाने साजरा केला जाणार नसेल तरच नवल.
गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये कोणताही धार्मिक उत्सव नेहमीच्या उत्साहाने साजरा करण्यात आला नव्हता. कारण विविध प्रकारची बंधने लादण्यात आली होती. यावेळी मात्र संपूर्ण मुक्त वातावरण असल्याने भाविकांना दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा शारदीय नवरात्रोत्सवाचा मनापासून लाभ घेता येणार आहे. अर्थात करोनासुराच्या तावडीतून हे जग मुक्त होण्याचा मार्गावर असले तरी पुन्हा एकदा या शक्ती देवतेला “दार उघड बये दार उघड’ अशी आळवणी करण्यासारखी परिस्थिती अद्यापही आहे, हे विसरून चालणार नाही. संत एकनाथ यांनी सोळाव्या शतकामध्ये जेव्हा “दार उघड बये दार उघड’ हे देवीच्या गोंधळाचे गीत रचले होते तेव्हा त्याला त्या काळातील मुघल राजवटीकडून होणाऱ्या जुलमी अत्याचारांचा संदर्भ होता. प्रजेवर तत्कालीन राजवटींकडून मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले जात होते अशा वेळी देवीने दार उघडून या आधुनिक असुराचा नाश करावा अशा प्रकारची आळवणी संत एकनाथांनी त्यांच्या या गोंधळ गीताच्या निमित्ताने केली होती. पण आज चारशे-पाचशे वर्षांनंतरही या गोंधळगीताची आठवण यावी अशा प्रकारची परिस्थिती आहे.
जगात सर्वत्रच अस्वस्थता आणि धार्मिक विद्वेषाचे वातावरण असताना भारतसुद्धा त्यापासून वाचला नाही. उलट गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. गेल्या आठवड्यामध्ये भारतातील राष्ट्रीय तपास संस्थांनी जेव्हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेच्या कार्यालयांवर छापे घातले त्यानंतर जी आक्षेपार्ह माहिती उपलब्ध झाली आहे, ती पाहता भारतात द्वेषाचे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे, हे उघड आहे. पुण्यासारख्या विद्येचे माहेरघर असलेल्या शहरामध्ये जेव्हा कार्यकर्ते पोलीस स्टेशन समोरच आक्षेपार्ह आणि भारतविरोधी घोषणा देतात तेव्हा ही परिस्थिती किती हाताबाहेर जाऊ शकते हे लक्षात घेण्यासारखे आहे. एकीकडे कट्टर हिंदुत्ववादी आणि मुस्लीम विरोधी संघटना म्हणून ज्या संघटनेबाबत आक्षेप घेतला जातो त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपासून जाणीवपूर्वक मुस्लीम संघटना आणि मुस्लीम नेत्यांसोबत भेटीगाठी सुरू करून विश्वासाचे वातावरण तयार करण्याचे आदर्श प्रयत्न सुरू केले असतानाच दुसरीकडे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या निमित्ताने जी विद्वेषाची भावना प्रसारित करण्याचे प्रकार होतात ते निश्चितच निषेधार्ह आहे.
एखादी व्यक्ती, नेता किंवा संघटना जाणीवपूर्वक अशा प्रकारची विद्वेषाची भावना निर्माण करून ती भावना अनेकांच्या डोक्यात आणून त्यांची माथी भडकवण्याचे काम करतात तेव्हा त्यांना आधुनिक असुरच म्हणावे. त्यांच्यावर कारवाई करून अशा परिस्थितीवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवले जात असले तरी मुख्य असुरांवर कारवाई होणे सर्वात जास्त महत्त्वाचे असते, हे या ठिकाणी लक्षात घ्यायला हवे. आधुनिक काळामध्ये हे काम प्रबोधनाच्या माध्यमातून आणि अशा वाट चुकलेल्या लोकांना मार्गावर आणूनच केले जाऊ शकते. जगातील कोणत्याही पाकिस्तानसारख्या इस्लामिक राष्ट्र असलेल्या देशातील लोकसंख्येपेक्षा ज्या भारतामध्ये मुस्लीम लोकसंख्या जास्त आहे त्या देशामध्ये मुस्लीम सर्वात जास्त सुरक्षित आहेत, असे अनेक अहवालही सांगतात. साहजिकच केवळ काही राजकीय नेत्यांच्या वैयक्तिक स्वार्थापायी आणि विशिष्ट हेतू समोर ठेवून घडवण्यात येणाऱ्या गोष्टींमुळे जर ही सामाजिक ऐक्याची भावना बिघडत असेल तर नेता रूपातील या असुरांनाही त्यांची योग्य जागा दाखविण्याची वेळ आता आली आहे, असेच म्हणावे लागते. त्यासाठीच या शक्ती देवतेला आपले दार आता उघडावेच लागेल. सामाजिक भावना संवादाची आणि सलोख्याची असेल तर त्या देशाची प्रगतीही होते म्हणून हे सर्वात महत्त्वाचे आहे. या जोडीला शक्तीची जी विविध रूपे आहेत त्या रूपांची दारेही या निमित्ताने खुली करण्याची गरज आहे. आरोग्य लक्ष्मीने आपले दार खुले करण्याच्या निमित्ताने सर्वत्र आरोग्यपूर्ण वातावरणनिर्मिती होईल, अशा प्रकारचा वर देण्याची गरज आहे.
महालक्ष्मीने सर्वांसाठी संपन्नतेचे आणि समृद्धीचे वरदान देण्याची गरज आहे आणि सरस्वतीने सर्वांसाठी बुद्धीचा योग्य वापर करण्याचा वर द्यायला हवा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संस्कृतीतील जो सर्वात महत्त्वाचा सण आहे त्या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये शक्ती देवतेची पूजा आणि सन्मान केला जातो म्हणजेच या कालावधीमध्ये महिला शक्तीचा सन्मान केला जातो. पण केवळ हे नऊ दिवस फक्त स्त्रीशक्तीचा सन्मान करून चालणार आहे का, याचाही विचार या निमित्ताने करायला हवा. अद्यापही महिलांना समाजात न मिळणारी समान वागणूक असो किंवा त्यांच्यावरील गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेले अत्याचार असोत त्या गोष्टींकडेसुद्धा आता गांभीर्याने बघण्याची गरज आहे. समाजातील पुरुषी मानसिकतेमध्ये यानिमित्ताने बदल होईल अशी आशासुद्धा आता करावी लागेल. पुरुषी मानसिकता फक्त पुरुषांमध्येच असते असे नाही, तर अनेक स्त्रियांमध्येसुद्धा अशा प्रकारची पुरुषी मानसिकता असते जी अनेक वेळा स्त्रियांसाठीच त्रासदायक ठरू शकते.
गेल्या पिढीतील बहुतांशी महिला अद्यापही परंपराना कवटाळून बसल्याने त्या स्वतःचे महत्त्व ओळखायला तयार नाहीत आणि आधुनिक काळातील इतर महिलांनीसुद्धा त्याच प्रकारे राहावे ही पुरुषी मानसिकता त्या जुन्या काळातील महिलांच्या मनात दिसून येते हीसुद्धा बदलण्याचा विचार यानिमित्ताने व्हायला हवा. या शारदीय नवरात्र उत्सवात सर्वत्र एक सकारात्मक आणि पवित्र असे वातावरण निर्माण झालेले असते. त्या वातावरणाचा लाभ आगामी कालावधीमध्येसुद्धा संपूर्ण समाजाला व्हायचा असेल, तर अशा उत्सवामध्ये जी मानसिकता तयार झाली आहे ती वर्षभर तशीच ठेवणे गरजेचे आहे. म्हणूनच या निमित्ताने पुन्हा एकदा या शक्ती देवतेला “दार उघड बये दार उघड’ आणि “आधुनिक असुरांचा नाश कर’ असे आवाहन करावेसे वाटते.