रशियातील वोस्टॉक येथे भारत-चीन आणि रशिया यांच्यात पार पडलेल्या संयुक्त युद्धसरावावरून पश्चिमी राष्ट्रांनी आक्षेप नोंदवले आहेत. तसेच या युद्ध सरावामुळे सध्याच्या काळात चीन आणि भारत या दोन देशांदरम्यान मैत्रीचे संबंध प्रस्थापित होत असल्याचे कोणतेही संकेत मिळाले नाहीत.
रशियात आठवडाभर सुरू असलेला वोस्टॉक 2022 संयुक्त युद्ध सराव यशस्वीपणे पार पडला. हा युद्ध सराव चर्चेत येण्याचे कारण म्हणजे भारत आणि चीनसारख्या एकमेकांना शत्रूराष्ट्रे समजणाऱ्या देशांचाही यात सहभाग होता. या दोन देशांच्या सीमेवर अनेक वर्षांपासून तणावपूर्ण स्थिती आहे. रशियाच्या भूमीत चीनसारख्या देशासोबत संयुक्त सैन्य सरावात भारतानेही सहभाग घ्यावा, यावर भारताच्या पारंपरिक सहकारी असलेल्या देशांची आगपाखड होणे स्वाभाविक आहे. अमेरिका आणि जपान यांच्या प्रतिक्रियांवरूनही असेच काहीसे स्पष्ट होते. अशा वेळी सामरिक सुरक्षेच्यादृष्टीने या संयुक्त कवायत चाचणीवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र या संयुक्त युद्ध सरावाचे फायदेही काहींनी स्पष्ट केले आहेत.
जागतिक आर्थिक आणि राजकीय दृष्टीने अशा युद्ध सरावांचे महत्त्व खूपच वाढले आहे. कोण, कुणासोबत आणि कुठे युद्ध सराव करीत आहेत, हे दोन देशांदरम्यान भागीदारी होत असल्याचे स्पष्ट संकेत असतात. युद्धसरावात सहभाग घेतल्यामुळे भारताची सैनिकी क्षमताच वाढत नाही, तर राष्ट्रीय हितासाठी एकसमान विचारधारा असलेल्या देशासोबत काम करण्याची राजकीय इच्छाशक्तीही दर्शविली जाते. सक्षम सैन्य असलेल्या भारतानेही याचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे.
वोस्टॉकमधील भारताच्या सहभागावरून जगभरात अनेक बाजूंनी टीका करण्यात आली. खासकरून पश्चिमी देशांनी नाराजी व्यक्त केली. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर याच देशांकडून रशियावर अनेक प्रकारे निर्बंध घालून रशियाला मेटाकुटीला आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अमेरिकेच्या वक्तव्यातून रशियाविरोधच दिसतो आहे. रशियासोबत युद्ध सराव करणाऱ्या देशाला अमेरिकेचे सांगणे आहे की, रशियाने युक्रेनवर विनाकारण विनाशकारी युद्ध लादले आहे, हे युद्धसरावात भाग घेतलेल्या देशांनी लक्षात घ्यावे. अर्थात अमेरिकेचा रोख भारताकडेच होतो. मात्र रशियासोबत भारताचा हा पहिलाच युद्ध सराव नव्हता. मागील वर्षी सप्टेंबरमध्येही रशियासोबत असाच युद्ध सराव यशस्वीपणे पार पडला होता, ज्यामध्ये चीन आणि पाकिस्तान परीक्षकाच्या भूमिकेत होते.
वोस्टॉकबाबत विचार करता हा एक खूप मोठा युद्ध सराव होता. यात 50 हजारांपेक्षा अधिक सैनिकांनी भाग घेतला. भारताशिवाय चीन, लाओस, मंगोलिया, निकारागुआ, सीरिया आणि अनेक पूर्वीच्या सोव्हियत राष्ट्रांनी यात सहभाग नोंदविला. भारताकडून यामध्ये 7/8 गोरखा रायफल्सने भाग घेतला. या युद्धसरावाचा उद्देश संयुक्त युद्ध कौशल्य आत्मसात करणे हा होता. यामध्ये फिल्ड ट्रेनिंग, रणनीतीबाबत चर्चा आणि सैनिकांच्या क्षमतांना पारखण्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता.
अशा प्रकारच्या युद्ध सरावांचे स्वरूप भलेही सामरिक असले तरी त्याची दुसरी बाजू राजकीयही असते. मात्र, हीच बाब यावेळी भारतासाठी समस्या निर्माण करणारी ठरली. कारण या युद्धसरावावर जपानने टीका केली. रशियाकडून दक्षिण कुरील बेटाच्या आजूबाजूला नौदलाच्या सरावाचा निर्णय घेतला होता. मात्र याला जपानचा तीव्र विरोध होता. खरे तर रशिया नौदल आणि चिनी नौदल यांचा यामागचा हा उद्देश होता की, रशिया आणि चीनचे आपापसातील घट्ट संबंध दर्शवून जपानवर दबाव टाकला जावा. या दोन देशांदरम्यान युद्ध सराव आता खूपच सामान्य बाब झाली आहे. मागील वर्षीच दोन्ही देशांनी 10 हजारांपेक्षा अधिक सैनिकांचा उत्तर-मध्य चीनमध्ये सराव घेतला होता. तसाच यावर्षीदेखील जेव्हा टोकियोत क्वाड देशांचे नेते चर्चा करत होते त्या दरम्यान चिनी एच-6 बॉंबर्स आणि रशिया टीयू-95 बॉम्बर्स जपान आणि दक्षिण कोरियाचेच डावपेच वापरत होते.
रशियासाठी वोस्टॉक येथील युद्ध सराव अनेक अंगांनी महत्त्वपूर्ण ठरला. या माध्यमातून रशियाने संदेश दिला आहे की, राशिया एकटा नाही. सामरिक संरक्षणाला प्राथमिकता देण्याचा प्रश्न असेल तेव्हा चीन आणि भारतासारखे देश रशियाच्यासोबत आहेत, हे रशियाने जगाला दाखवून दिले आहे. चीनसाठी हा युद्धसराव एक शक्तिशाली सैन्य बळासोबतच परस्पर संबंध सुधारण्याचे माध्यम होता. विशेष म्हणजे पश्चिमी राष्ट्रांसोबत शीतयुद्धाची छाया गडद होत असताना रशियासोबतचे संबंध घट्ट असणे चीनच्या फायद्याचे ठरणार आहेत. भारतासाठी मात्र ही कठीण वेळ आहे. कारण चीनसोबतचे तणावपूर्ण संबंध पाहता दोन्ही देशांदरम्यान या संयुक्त युद्ध सरावामुळेही कडी जुळली नाही. युद्धसराव रशियाने आयोजित केला होता, हा मुद्दा चीन आणि भारतादरम्यान अंतरच निर्माण करणारा आहे. कारण हा युद्धसराव चीन आणि भारताने संयुक्तरित्या आयोजित केला असता तर दोन्ही देशांच्या संबंधाबाबत काही चांगले धोरण पुढे आले असते. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर भारताने कोणत्याही प्रकारे टीका करण्याचे टाळले आहे तसेच रशियावर पश्चिमी देशांनी घातलेल्या निर्बंधांमध्येही भाग घेतला नाही. खरे तर भारतच या स्थितीचा फायदा घेऊन रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल विकत घेत आहे.
जर युद्ध सराव हा एखाद्या देशाचा राजकीय हेतू असेल तर भारताला हेच काम अधिक सावधपणे करणे गरजेचे आहे. रशिया आणि चीन भारताच्या भागीदारीचा आपल्या हितासाठी वापर करीत असतील, तर भारतालासुद्धा आपल्या स्तरावर सावध राहून आपली भूमिका मांडता आली पाहिजे. वोस्टॉकबाबत कितीही टीकाटिप्पणी झाली, तरीसुद्धा इतर देशांच्या तुलनेत भारत अमेरिकेसोबत सर्वात जास्त तसेच उच्च दर्जाचा युद्धसराव करतो. मागील महिन्यातच भारत आणि अमेरिका या देशांदरम्यान वज्रप्रहार चाचणीचा 13 वा भाग पार पडला, तर पुढील महिन्यात उत्तराखंडमध्ये चीन सीमेजवळसुद्धा नियमित संयुक्त युद्धसराव होणार आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रात जपान आणि ऑस्ट्रेलियासारख्या समविचारी देशांसोबतही भारतीय युद्धसरावाला वेग येत आहे. राजकीय संबंध ही एक कला आहे आणि आता वेळ आली आहे की, त्यात भारतानेही शहाणपण दाखवायला पाहिजे.