कोलोंबो – श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरात आलेल्या चीनच्या युआंग वॅंग 5 या टेहळणी नौकेला भारताने घेतलेल्या आक्षेपावरून चीनने थयथयाट केला आणि भारताचा आक्षेप म्हणजे श्रीलंकेच्या सार्वभौमत्वामध्ये केलेला हस्तक्षेप असल्याची टीका केली. श्रीलंकेतील चीनच्या राजदूतांनी केलेल्या या टीकेवरून भारताने चीनला खडे बोल सुनावले आहेत.
चिनी राजदूतांनी केलेली ही टीका म्हणजे मूलभूत मुत्सदेगिरीच्या शिष्टाचारांचे उल्लंघन आहे. चिनी राजदूतांचे हे विचार एकतर त्यांचे स्वतःचे विचार असावेत किंवा त्यांच्या या विचारांमध्ये व्यापक प्रमाणात राष्ट्रीय भूमिकेचे प्रतिबिंब दिसत असावे, असे भारताने म्हटले आहे.
चीनचे श्रीलंकेतील राजदूत की झेन्होंग यांनी भारताच्या आक्षेपांबद्दल कडवट टीका करणारे निवेदन प्रसिद्ध केले होते. युआंग वॅंग 5 या नौकेच्या माध्यमातून सागरी सर्वेक्षण आणि अभ्यास केला जातो. त्याबाबत त्रयस्थांनी कोणत्याही पुराव्याशिवाय आक्षेप घेणे म्हणजे श्रीलंकेच्या सार्वभौमत्वामध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये थेट हस्तक्षेप आहे. श्रीलंकेच्या उत्तरेकडील देशाकडून सातत्याने श्रीलंकेच्या अंतर्गत कारभारामध्ये असा हस्तक्षेप केला जात असतो. श्रीलंकेतील यादवीच्या काळातही उत्तरेकडील देशाकडून अशाप्रकारचा हस्तक्षेप केला गेला होता, असे की झेन्होंग यांनी म्हटले होते.
या टीकेला श्रीलंकेतीलच भारतीय उच्चायुक्तालयाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. चीनकडून कर्जाचे ओझे टाकण्यात येत असून छोट्या देशांसमोर आता मोठे आव्हान उभे केले जाते आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या श्रीलंकेला मदतीची गरज आहे. अनावश्यक दबावाची किंवा अनावश्यक वादाची गरज नाही, असे भारतीय उच्चायुक्तालयाने म्हटले आहे.
श्रीलंकेच्या सार्वभौमत्वाबाबत भारताविषयी केलेले निवेदन स्पष्टपणे नाकारले जाते आहे. भारत श्रीलंकेच्या सार्वभौमत्वाचा नेहमीच आदर करत आहे. श्रीलंका नेहमीच स्वतःचा निर्णय स्वतःच घेतो, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे.