मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतरही तिन्ही पक्षांमध्ये नाराजीनाट्य सुरूच आहे. शिवसेनेने इतर पक्षांशी चर्चा न करता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला. यावरून काॅंग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रावादीकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये काॅंग्रेसला हवे तसे स्थान मिळत नसल्याने काॅंग्रेसकडून अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. काॅंग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या असताना काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
काॅंग्रेस महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जाते, यावर अशोक चव्हाण म्हणाले की, असा कोणताही निर्णय झालेला नाही. कालच महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक झाली. पण त्यात असा कोणताही विषय आला नाही. असे चव्हाण यांनी म्हंटले आहे. त्यामुळे सध्या तरी काॅंग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या चर्चांना ब्रेक लागला आहे.